पुणे | शबनम न्यूज
पुरंदर तालुक्यातील बहुतांश गावामध्ये जिओ कंपनीला नेटवर्क नसल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. इंटरनेट स्पीड अतिशय कमी आहे .बोलता बोलता फोन कट होत आहेत , काही ठिकाणी अचानक नेटवर्क गायब होत आहे. जिओ ग्राहकांनी संख्या मोठी असल्याने मोठे संकट निर्माण झाले आहे.
सासवड शहर ,बोपगाव , चांबळी , कोडीत , भिवरी ,गराडे , जेजुरी परिसरातील गावांमध्ये बरोबरच बेलसर , रानमळा भागात तसेच तालुक्यातील अनेक गावांमध्ये जिओ कंपनीचे नेटवर्क व्यवस्थित नसल्यामुळे नागरिकांमधुन नाराजी व्यक्त होत आहे. पंधरा दिवसांपासुन जिओ कंपनीच्या ग्राहकांचे फोन अचानक डिसकनेक्ट होतायेत ,फोनवर बोलणार्या व्यक्तीचा आवाज ही येत नाही. इंटरनेट स्पीड तर केवळ नावालाच आहे. कंपनीच्या अधिकृत हेल्पलाईन नंबरवरुन उडवाउडवीची उत्तर दिली जात आहेत यामुळे जिओ कंपनीचा भोंगळ कारभार आता चव्हाट्यावर आला आहे.
पुरंदर तालुक्यातील विविध भागात आपले सरकार केंद्र , अनेक ग्रामपंचायतीतील आॅनलाईन कामं पुर्ण करण्यास अडथळे येत आहेत. शाळा ,महाविद्यालयातील , विद्यार्थी, शिक्षक वर्ग यांचीही महत्वाची काम रखडलेली आहेत. जिओ कंपनीच्या वरिष्ठ आधिकार्यांनी त्वरित दखल घेवुन समस्येचे कायमस्वरुपी निवारण करण्यासाठी तातडीने लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.