शबनम न्युज | पुणे
कामगारांचे जीवनमान सुधारण्यासाठी काँग्रेस सरकारने कामगार कायदे आणले होते. आज हे कामगार कायदे मोडीत काढण्याचे काम भाजप सरकार करीत आहे. घरेलू कामगारांच्या योजना बंद आहेत. कामगारांच्या नावाखाली भाजप भ्रष्टाचार करीत आहे. कामगारांना रोजगार नसून ते महागाईने त्रस्त आहेत. या परिस्थितीत बदल घडवण्यासाठी महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन राष्ट्रीय मजदूर संघाचे व महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार कर्मचारी काँग्रेसचे अध्यक्ष व कामगार नेते सुनिल शिंदे यांनी केले.
महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार कर्मचारी काँग्रेस व राष्ट्रीय मजदूर संघ आयोजित जागतिक कामगार दिनानिमित्त बुधवारी काँग्रेस भवन येथे भव्य कामगार मेळावा घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
राष्ट्रीय मजदूर संघाचे व महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार कर्मचारी काँग्रेसचे अध्यक्ष व कामगार नेते सुनिल शिंदे आणि पुणे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी मेळाव्याचे आयोजन केले होते.
याप्रसंगी काँग्रेसचे जेष्ठ नेत्यामाजी खासदार ॲड. वंदना चव्हाण, ॲड. अभय छाजेड, महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशचे प्रवक्ते अतुल लोंढे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नितीन कदम, राष्ट्रीय मजदूर संघाचे पुणे शहराध्यक्ष एस. के. पळसे, उपाध्यक्ष सीताराम चव्हाण, सचिव राहुल वंजारी, हॉस्पिटल युनिट अध्यक्षा मेघा काकडे, सुरक्षारक्षक प्रतिनिधी सरिता धुळेकर, एस.टी. कामगार युनियन अध्यक्ष बापू ढावरे, ससून रुग्णालय युनिट अध्यक्ष गीतेश वालेकर यांच्यासह बांधकाम कामगार, माथाडी कामगार, मनपा कंत्राटी कामगार, घरेलू महिला कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कामगारांच्या विरोधात भाजप सरकार काम करीत आहे. कामगारांचे प्रश्न प्रलंबित आहेत. मागील 10 वर्षांपासून कामगारांच्या विरोधात भाजप काम करीत असून मूठभर लोकांसाठी ते काम करीत आहेत. कामगार व महिला कामगारांना न्याय देण्यासाठी महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांना निवडून देण्याचे आवाहन यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माजी खासदार ॲड. वंदना चव्हाण यांनी केले.
महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशचे प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले, गरीब महिलांना आर्थिक सक्षम करणे गरजेचे आहे. त्यासाठी काँग्रेस महिलांना त्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी वर्षाला 1 लाख रुपये सन्मान योजना सुरू करणार आहे. त्यांच्यासाठी आरोग्य विमा योजना सुरू करणार आहे. कामगारांच्या योजना सुरू करणार असून कंत्राटी पद्धत बंद करून कायमस्वरूपी भरती सुरू करणार असल्याचे यावेळी लोंढे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, सध्या मोदी सरकार कंत्राटी कामगारांचेशोषण करीत आहे. कामगारांचे शोषण थांबवण्यासाठी व त्यांना आर्थिक, सामाजिक बळकट करण्यासाठी रविंद्र धंगेकर यांना निवडून आणावे, असे आवाहन त्यांनी केले.
सिताराम चव्हाण म्हणाले, कामगारांच्या जीवांवर मोदी सरकार उठले आहे. कामगार विरोधी कायदे करून मुठभर उद्योगपतींना पुढे नेण्यासाठी मोदी सरकार काम करीत आहेत. कामगार कायदे बळकट करण्यासठी रविंद्र धंगेकर यांचे हात बळकट करा. आपण संघटित झाल्याशिवाय कामगार कायद्यांचे संरक्षण होणार नाही. संघटित होऊन धंगेकर यांना जास्तीत जास्त मताधिक्याने विजयी करू असा निर्धार मेळाव्यात करण्यात आला. अनेक महिला, कामगारांनी धंगेकर यांचाच विजय होणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. के. पळसे यांनी केले.