परिक्षा तोंडावर असताना हॉलतिकीटसाठी लागल्या लांबच-लांब रांगा
औंध | शबनम न्यूज
रयत शिक्षण संस्थेचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात ढिसाळ नियोजन पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचे हाल होताना दिसून आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची अंतिम सत्र परिक्षा उद्यापासून (२०/०७/२०२२) पासून सुरू होणार आहे हे माहीत असून देखील ढिसाळ नियोजनामुळे परिक्षेच्या एक दिवस अगोदर हॉलटिकीट वाटपास सुरवात करण्यात आली. त्यामुळे महाविद्यालयात मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची गर्दी झाली व हॉलटिकीटसाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडाली. त्यामुळे महाविद्यालयात मोठ्या रांगा लागल्या होत्या. ज्यामुळे सकाळी आठ वाजल्यापासून महाविद्यालयात आलेल्या विद्यार्थ्यांचे रांगेत उभे राहून खूप हाल झाले.
कार्यालयीन कर्मचाऱ्यांची काम करण्याची पद्धतही अत्यंत संथ असल्याने प्रत्येक विद्यार्थ्यास हॉलटिकीट मिळविण्यास विलंब लागत होता. याबद्दल कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता, ते उडवा-उडवीची उत्तरे देताना दिसले. महाविद्यालयातील कार्यालयीन कर्मचारी कायमच विद्यार्थ्यांशी उर्मटपणे वागत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्याबद्दल रोष आहे. बरं, याबद्दल शिक्षकांना गऱ्हानं सांगावे तर, तर त्यांचीही भाषा उर्मट. सकाळपासून रांगेत उभे राहिल्यानंतर दुपारी अचानक सर्व्हर डाऊन झाल्यामुळे काम थांबले व त्यानंतर मधेच जेवणाची सुट्टी झाली कार्यालयीन कर्मचारी जेवायला गेले, पण विद्यार्थी मात्र उपाशीच रांगेत ताटकळत उभे होते. जेवण झाल्यानंतर बाहेर विद्यार्थ्यांची गर्दी दिसूनही कर्मचारी गप्पा मारताना दिसत होते.
उद्यापासून परिक्षा असल्याने विद्यार्थ्यांच्या मनात एकच प्रश्न होता, आजचा पूर्ण दिवस इथेच गेला तर अभ्यासाची उजळणी नेमकी करावी तरी कधी? त्यात हॉलतिकीट मिळविण्याची प्रक्रिया नेमकी काय? हे देखील विद्यार्थ्यांना कोणीही सांगितले नव्हते, त्यामुळे काही विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या अपूर्ततेमुळे अनेक समस्या येत होत्या. गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.रमेश रणदिवे सर, प्रा. अनंत सोनावणे सर, डॉ. बंडोपंत कांबळे सर हे सर उपस्थित होते. परंतु ३.३० नंतर हे सर्व शिक्षक तिथून गायब झाले.
दिवसभर रांगेत उपाशीपोटी उभे राहिल्यानंतर चार वाजण्याच्या सुमारास विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण होते. या दरम्यान अनेक विद्यार्थ्यांमध्ये भांडणे झाली, ते थांबविण्यासाठी शिक्षक उपस्थित नव्हते. सायंकाळी सहा वाजले तरी विद्यार्थ्यांची गर्दी काही केल्या कमी होत नव्हती.
अचानकपणे हॉलतिकीट वाटपाचे कळाल्याने अनेक अर्धवेळ नोकरी करून आपली उपजीविका भागविणाऱ्या विद्यार्थ्यांना ऐनवेळी सुट्टी मिळाली नाही. हॉलतिकीटसाठी एक विद्यार्थिनी ऑफिसमधून थोडा वेळ मागून महाविद्यालयात आली मात्र गर्दीमुळे पूर्ण दिवस गेल्याने तिला नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याने, तिची अवस्था रडावणी झाली होती. हा प्रकार शिक्षकांच्या कानावर घातल्यानंतर, एका शिक्षकाने उत्तर दिले की, ‘‘विद्यार्थी हा विद्यार्थीच असला पाहिजे, त्याने नोकरी करणे अपेक्षीत नाही.’’ यावर त्या विद्यार्थिनीने, रयत शिक्षण संस्थेच, संस्थापक असणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटलांचे, ‘‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’’, हे घोषवाक्य त्यांना ऐकवले ज्यावर तो शिक्षक अनुत्तर झाला.
येथून पुढेही महाविद्यालयाच्या ढिसाळ नियोजनामुळे विद्यार्थ्यांचे हाल झाल्यास, विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
महाविद्यालयात उद्भवलेल्या या परिस्थितीला तोडगा म्हणून नाईलाजाने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना उद्या होणाऱ्या परीक्षेत ओळखपत्र घेऊन परीक्षेला बसण्यास महाविद्यालय वतीने परवानगी देण्यात आली, बैठक क्रमांक न मिळाल्याने विद्यार्थ्यांना उद्या ओळखपत्र वरच आपली परीक्षा द्यावी लागणार आहे.