शबनम न्युज | पुणे
डॉ.वि.य.कुलकर्णी लिखित अष्टांगदर्शनी गीता आणि दिलीप महाजन लिखित ‘विवेकानंद केंद्रातील मंतरलेले दिवस’ या पुस्तकांचे प्रकाशन शनीवारी सायंकाळी झाले. विवेकानंद केंद्र कन्याकुमारी, मराठी प्रकाशन विभागाने हा प्रकाशन सोहळा दि. ३ डिसेंबर रोजी आयोजित केला होता.डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.शरद कुंटे आणि विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचे महासचिव भानुदास धाक्रस यांच्या हस्ते हे प्रकाशन झाले. हा कार्यक्रम गणेश हॉल,न्यू इंग्लिश स्कुल,टिळक रस्ता येथे ३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता झाला.
डॉ. शरद कुंटे म्हणाले, ‘अष्टांगदर्श़नी गीता’ चे लेखक वि. य. कुलकर्णी नेहमी सांगत असत कि गीता हा ग्रंथ निवृत्ती नंतर वाचायचा नसून, तो लोकव्यवहारात वापरण्याचा आणि सामाजिक कार्यात प्रेरणा देणारा ग्रंथ आहे “
प्रत्येक व्यक्ती कार्यप्रवण झाल्यास समाज आणि समाजकार्य अधिक गतीशील होऊ शकेल आणि समाजाला, वाचकाला मोठे कार्य करण्यासाठी कार्यप्रवण करण्यासाठी गीता आणि गीतेवरील हे कुलकर्णी यांचे हे पुस्तक अधिकाधिक लोकांनी वाचणे आवश्यक आहे, असेही मत कुंटे यांनी व्यक्त केले.
भानुदास धाक्रस म्हणाले, ‘ दिलीप महाजन यांच्या ‘ विवेकानंद केंद्रातील मंतरलेले दिवस ‘ या पुस्तकात जीवन जगण्यासाठीचे महामंत्र त्यांनी जागोजागी दिले आहेत. यात वेगवेगळ्या भाषा कशाप्रकारे अतिशय जलदरितीने शिकता येईल याचेही मार्गदर्शन केले आहे. समाज अधिक श्रेष्ठ करण्यासाठी विवेकानंदांचे मार्गदर्शक विचार आणि त्यांनी दिलेले मंत्र कशाप्रकारे आपल्या जीवनात अंगीकार करावे याचेही हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल, असेही मत भानुदास धाक्रस यांनी व्यक्त केले.
आपल्या जीवनात आदर्श व्यक्तिमत्वांचा सत्संग झाल्यास जीवन अधिक समृद्ध होते, त्या प्रमाणेच चांगल्या पुस्तकांचा सत्संगही आवश्यक असल्याचे मतही भानुदास धाक्रस यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विवेकानंद केंद्राच्या प्रकाशन विभागाचे सचिव सुधीर जोगळेकर यांनी केले. प्रणिता कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. तर स्वाती कुलकर्णी यांनी आभार मानले.