शबनम न्युज | औरंगाबाद
प्रतिनिधी : दिलीप सोनकांबळे
आई-वडील शेतात कापूस वेचणी करत असताना झाडाखाली खेळत असलेल्या चिमुकलीचा कोल्ह्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. धम्मपरी समाधान सोनवणे (वय 3 वर्ष, रा. आडगाव, कन्नड) असे मृत्यू पावलेल्या चिमुकलीचे नाव आहे.
धम्मपरीच्या दुर्दैवी मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
धम्मपरीचे आई- वडील रविवारी शेतात कापूस वेचणी करत होते. तर धम्मपरी झाडाखाली खेळत होती. त्याचवेळी अचानक कोल्ह्याने धम्मपरीवर हल्ला केला. तिच्या डोक्याचा मोठा लचका तोडला आणि हातालाही चावा घेतला. या घटनेत परी गंभीर जखमी झाली. तीला उपचारासाठी औरंगाबादच्या शासकीय घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान परीचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. दरम्यान, वनपाल यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन मदतीचे आश्वासन दिले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.