शबनम न्युज | मुंबई (वृत्तसंस्था)
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालट होताना दिसत आहेत. आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीला जाऊन अमित शहा यांची भेट घेतली. यानंतर राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. आता वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी थेट काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहीत आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षावरील विश्वास उडाला असून, आम्ही काँग्रेसला सात लोकसभा मतदारसंघांमध्ये पाठिंबा देण्यास तयार असल्याचा प्रस्ताव दिला आहे. काँग्रेसने आपला निवडीच्या कोणत्याही सात जागा सुचवाव्यात, त्या जागांवर आम्ही काँग्रेसला पाठिंबा देऊ, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
मल्लिकार्जुन खरगे यांना दिलेल्या पत्रात आंबेडकरांनी म्हटले आहे की, भारत जोडो यात्रेच्या समारोप सभेवेळी तुम्हाला आणि राहुल गांधी यांना भेटून आनंद झाला. या भेटीवेळी आपली सविस्तर चर्चा होऊ न शकल्याने मी आज आपणास हे पत्र लिहीत आहे. लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा झाली असून वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण न देता महाविकास आघाडीचे नेत्यांच्या सतत बैठका होत आहेत. आमच्या सोबत झालेल्या काही बैठकींमध्ये वंचितच्या प्रतिनिधींचं म्हणणं ऐकून घेण्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाने नकार दिला. महाविकास आघाडीत या दोन्ही पक्षांचा वंचित बहुजन आघाडी विषयी असलेल्या चुकीच्या दृष्टिकोनामुळे आमचा त्यांच्यावर विश्वास उडाला आहे, अशा शब्दात आंबेडकर यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.