शबनम न्युज | पुणे
मोदी सरकारने देशातील नागरिकांना विकासाचे स्वप्न दाखवून फसवले. पुन्हा सत्तेत येण्यासाठी पुलवामासारखी घटना घडून शहिदांच्या नावाखाली मते मागितली. 10 वर्षे फक्त महागाई, बेरोजगारी, गुन्हेगारी, महिलांवर अत्याचार त्यांनी केले आहेत. फक्त भ्रष्टाचार करून भाजपला मोठे केले, आणि जनतेला रस्त्यावर आणले आहे. त्यांनी देश विकायला काढला आहे. आता कोणताच विकासाचा मुद्दा हातात नसल्याने राम मंदिराच्या नावावर मते मागण्यासाठी पुढे आले आहेत. देशाचा विकासासाठी इंडिया आघाडीचे उमेदवार रविंद धंगेकर यांना विजयी करा, असे आवाहन विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केले.
माजी उपमहापौर आबा बागूल यांच्यामागे पर्वती मतदारसंघात जेष्ठ नागरिक, महिला व तरुणांची शक्ती आहे, त्यामुळे ही त्यांची मते धंगेकर यांना मताधिक्याने विजयी करणार आहे, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आ. रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ रविवारी शिवदर्शन–सहकार नगर परिसरातील वसंतराव बागुल उद्यानाजवळ श्री लक्ष्मीमाता मंदिराजवळ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार व उमेदवार रवींद्र धंगेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजक व काँग्रेस पक्षाचे माजी उपमहापौर आबा बागुल, पुणे नवरात्र महिला महोत्सवाच्या अध्यक्ष जयश्रीताई बागूल, अमित बागूल उपस्थीत होते. तसेच काँग्रेसचे माजी जेष्ठ नेते व माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी महापौर कमलताई व्यवहारे, पुणे शहर महिला काँग्रेस अध्यक्ष पूजा आनंद, शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा संगीता तिवारी, ब्लॉक अध्यक्ष संतोष पाटोळे, विश्वास दिघे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बाळासाहेब ओसवाल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला अध्यक्षा मृणाल वाणी यांच्यासह आपचे पदाधिकारी, इंडिया आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाला पर्वती मतदारसंघातील महिला, जेष्ठ नागरिक व तरुणांची प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी धंगेकर यांच्या विजयाच्या घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला.
विजय वडेट्टीवार म्हणाले, महाराष्ट्रातील दोन्ही टप्प्यात इंडिया आघाडीचे उमेदवार निवडून येणार आहेत. जनता भाजपच्या भूलथापांना बळी पडणार नाही. मोदी सरकाने प्रचंड महागाई वाढवून जनतेला रस्त्यांवर आणले आहे. तरुणांना रोजगार दिला नाही. एकही योजना नागरिकांपर्यंत पोचवली नाही. जीवनावश्यक वस्तूंवर कर लावून गरीबांच्या तोंडातील घास मोदींनी हिरावला आहे. आता जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देत आहेत. महिलांवरील अत्याचार करणाऱ्यांना उमेदवारी देऊन त्यांना विजयी करण्याचे आवाहन करतात. हा त्यांचा निर्लज्जपणा महिला मतदानातून दाखवून देतील.
ते पुढे म्हणाले, पुण्यात कोयता गॅंगने धुडगूस घातला आहे. अंमली पदार्थांची सर्रास विक्री होत आहे. येथे कायदा सुव्यवस्था राहिली नाही. केवळ भाजपाच्या पाठींब्याने पुण्याचे वातावरण बिघडले आहे. पुण्याची कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व विकास करण्यासाठी रवींद्र धंगेकर यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या असे आवाहन विजय वडेट्टीवार यांनी केले.
आई-वडिलांची शक्ती आबा बागुल यांच्या पाठीशी आहे आज पर्यंत त्यांनी 70 हजार जेष्ठ नागरिकांना काशी विश्वेश्वराचे मोफत दर्शन घडवले आहेत. येथील प्रत्येक नागरिक आबांना आपल्या कुटुंबातला घटक मानतात व त्यांची सेवा करतात त्यामुळे ते आमदार झाल्याशिवाय राहणार नाही असे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
रविंद्र धंगेकर म्हणाले, आबा बागुल हे माझ्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहे. महानगरपालिकेमध्ये त्यांनी अनेक मोठी पदे भूषवले आहेत. पुणेकरांची नाळ त्यांच्याशी जोडलेली आहे. नागरिकांच्या विश्वासावर काँग्रेसने मला उमेदवारी दिली आहे. माझ्या पाठीशी सामान्यांची ताकद आहे. सध्या देशाची परिस्थिती हुकूमशाही कडे नेणारी आहे. सध्याची निवडणूक स्वाभिमानाची आहे. विद्यार्थी, शहराचे अनेक समस्या, माहिलांचे, कष्टकऱ्यांचे अनेक प्रश्न आपल्यासमोर आहेत. आपल्याला लोकशाहीचा विजय करायचा आहे त्यामुळे मला निवडून द्या, असे आवाहन रवींद्र धंगेकर यांनी यावेळी केले.
आबा बागुल म्हणाले, माझ्यावर प्रेम करणारी सत्तर हजार ज्येष्ठ आई-वडील आहेत. त्यांच्या हृदयात माझे स्थान आहे, हीच माझी गॅरंटी आहे. देशासाठी बलिदान देणाऱ्या गांधी घराण्यांच्या पक्षात मी कार्य करीत आहे याचा मला अभिमान आहे. काँग्रेसने आचार, विचार, संस्कार दिला आहे. हेच विचार आम्ही पेरत आहे. रवींद्र धंगेकर यांच्या रूपाने आबा बागुल उभा आहे. धंगेकर यांना प्रचंड मताने निवडून द्या, असे आवाहन यावेळी त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष गळे यांनी केले, तर बाळासाहेब ओसवाल यांनी आभार मानले.