शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी चिंचवड औद्योगिक क्षेत्रातील पवारवस्ती, कुदळवाडी, चिखली औद्योगिक परिसरात गेल्या एक महिन्यापासून विजेचे खंड होण्याचे प्रमाण वाढलेले असून या परिसरात विजेचा लपंडाव सारखा चालू असल्याने या परिसरातील उद्योजक हैराण झालेले आहेत. फ्युज जाणे, जंप तुटणे हे प्रकार वारंवार होऊ लागले आहेत.औद्योगिक परिसरातील महावितरण कार्यालयात लक्ष घालून संबधित अधिकारी व वायरमन यांना योग्य ती समज द्यावी किंवा नविन अधिकारी, वायरमन यांची भरती करावी अशा मागणीचे निवेदन पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटना वतीने संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी मुख्य अभियंता महावितरण कार्यालय पुणे यांच्या कडे दिले आहे
निवेदनात संदीप बेलसरे यांनी नमूद केले आहे कि उद्योजक हा अगोदरच कच्च्या मालाच्या वाढलेल्या किंमती, लॉकडाऊन काळात परराज्यात निघून गेलेले कामगार, वाढलेले वीजदर यामुळे कंबरडे मोडलेला आहे. काम येण्यास सुरुवात झालेली असतांना विजेच्या या समस्येमुळे उद्योजकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. तो चालू महिन्याचे विजेचे बिल देखील भरू शकत नाही. पर्यायाने महावितरणचे आर्थिक नुकसानच होत आहे. उद्योजकाला काम आले ते वेळेत पूर्ण झाले तर तो वीज बिल भरणे किंवा इतर खर्च करू शकेल हे आर्थिक चक्र फिरत राहिले तरच राज्याचा,देशाचा विकास होऊ शकतो.
वरील औद्योगिक परिसरात पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे सचिव श्री. जयंत कड, संचालक श्री नवनाथ वायाळ, संचालक श्री. भारत नरवडे यांनी पाहणी केली असता त्यांना असे दिसून आले की महावितरणच्या कार्यालयात विजेचे साहित्य देखील उपलब्ध नसते. उदा. फ्युज, फ्युज तार, केबल, इतर साहित्य. तसेच त्यांच्या असेही लक्षात आले की वायरमन, अधिकारी वीज ग्राहकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करतात. वीज ग्राहकांचे फोन उचलत नाहीत, फोन उचलला तर योग्य उत्तरे दिली जात नाही, वीज विषयक एखादी तक्रार असल्यास त्याकडे दोन दोन दिवस लक्ष दिले जात नाही.
कृपया आपण वरील औद्योगिक परिसरातील महावितरण कार्यालयात लक्ष घालून संबधित अधिकारी व वायरमन यांना योग्य ती समज द्यावी किंवा नविन अधिकारी, वायरमन यांची भरती करावी अन्यथा या परिसरातील उद्योजक हे आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.