लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा ; अपना वतन संघटनेच्या चर्चासत्रात सामूहिक मागणी
शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निम्मिताने अपना वतन संघटनेच्या पिंपरी चिंचवड शहर शाखेच्या वतीने बुधवार दि. ४ ऑगस्ट २०२१ रोजी मातंग समाजाच्या आर्थिक ,शैक्षणिक ,सामाजिक व राजकीय स्थिती व समाजाचे मूळ प्रश्न या विषयवार विविध सामाजिक संघटनांची सामूहिक चर्चा आयोजित केली होती.उल्लेखनीय बाब म्हणजे या चर्चा सत्रामध्ये सर्व जातीधर्माच्या व समाजाच्या संघटना व कार्यकर्ते सामील झाल्याने हे चर्चासत्र राष्ट्रीय एकात्मतेचे उदाहरण ठरले आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. धनंजय भिसे , प्रमुख पाहुणे आझाद समाज पार्टीचे राज्य सचिव ऍड क्रांती सहाणे उपस्थित होते. यावेळी झोपडपट्टीतील जण्टमध्ये जाऊन त्यांच्या प्रश्नांवरती प्रकाश टाकणारे युवक सुदर्शन चखाले यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमादरम्यान लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्वातंत्र्य चळवळी मधील व स्वातंत्र्या नंतर शोषित घटकांसाठी असलेले योगदान , साहित्य पत्रकारिता ,नाट्य क्षेत्रातील योगदान ,संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील योगदान व संबंध समाजासाठी केलेले कार्याचा गौरव होणे आवश्यक आहे. त्यामुळे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात यावा अशी एकमुखी मागणी करण्यात आली.
या चर्चासत्रामध्ये अपना वतन संघटनेचे अध्यक्ष यांनी सांगितले कि, समाजरचनेत एक जात दुसऱ्या जातीला कमी लेखते व स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ दाखवण्याचा प्रयत्न करते ,जातीयतेच्या या दुर्धर रोगातून समाज रोगमुक्त झाला पाहिजे. तसेच मातंग समाजातील अनेक विचारवंत समाजाचे प्रश्नावर बोलतात परंतु काही जण स्वतःच्या स्वार्थासाठी त्याना आंबेडकर वादापासून अंधकारात ठेऊन कट्टरवादाकडे घेऊन जातात.त्यामुळे समाज मूळ प्रश्नांपासून भरकटला जातो. पुढे बोलताना त्यांनी राज्य शासनाकडे मागणी केली कि, क्रांतिवीर लहुजी साळवे आयोगाच्या आवश्यक शिफारशी स्वीकारून समाजाला आर्थिक ,सामाजिक,शैक्षणिक दृष्टिकोनातून सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावेत.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ऍड क्रांती सहाणे यांनी मागासवर्गीय समाजातील वाढत्या अत्याचारवर भाष्य केले. व्यवस्था परिवर्तनासाठी राजकीय परिवर्तन आवश्यक आहे . त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी राजकीय भूमिका घेऊन जनआंदोलन उभारावे .अठरापगड जातींना एकत्र करून क्रांतीची मशाल पेटवण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. धनंजय भिसे यांनी मातंग समाजाचा इतिहास , स्वातंत्र्यकाळातील समाजाचे योगदान याबद्दल माहिती दिली तसेच मातंग समाजाच्या आर्थिक ,राजकीय ,सामाजिक व शैक्षणिक स्थितीचे विश्लेषण केले. आणि केवळ मातंग समाजाचं नव्हे तर सगळ्या समाजातील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन जातीवाद मोडून काढून व्यवस्थेविरोधात बंड करण्याचे आव्हान केले.
सदर कार्यक्रमात मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव ,छावा मराठा युवा महासंघाचे धनाजी येळकर पाटील , संभाजी ब्रिगेड चे सतीश काळे ,अपना वतन संघटनेचे पिंपरी चिंचवड कार्याध्यक्ष हमीद शेख , महिला अध्यक्ष राजश्री शिरवळकर ,एमएम च्या महिला अध्यक्ष रुहीनाज शेख , ओबीसी संघर्ष समितीचे सुरेश गायकवाड , जेतवान बुद्धविहारचे सुभाष जाधव ,योद्धा प्रतिष्ठान प्रमोद शिंदे ,नॅशनल पँथरच्या संगीत शहा , घर बचाव समितीच्या सुनीता फुले , अर्चना मेंगडे , विकास जगधने ,दीपक चखाले , सचिन अडागळे ,आम आदमी पार्टीचे वैजनाथ शिरसाठ ,कैलास जोगदंड ,ग्राहक पंचायत चे अमोल उबाळे ,रझाक शेख ,शिवसेना अल्पसंख्याक उपशहरप्रमुख शाकीर शेख , गणेश पवार ,ऋषिकेश ओहाळ ,संकल्प युवा फाउंडेशन चे गणेश जगताप , युनूस पठाण ,सागर गायकवाड ,सुभाष लोंढे ,अमोल सावदेकर ,विनोद मोरे ,तौफिक पठाण ,विशाल निर्मल यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.