शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
प्रतिनिधी | पिंपरी
स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागांमध्ये शिक्षणाची गंगा पोहोचवण्यासाठी स्थापन झालेल्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचा आज वटवृक्ष झाला आहे. अनेक थोर व्यक्तिमत्वांच्या त्याग व कार्यामधून उभ्या राहिलेल्या आणि आज घडीला पारंपारिक अभ्यासक्रमांबरोबरच विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांची संधी बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणाऱ्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचा शैक्षणिक प्रवास निश्चितच स्फूर्तीदायक आहे, असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.
महाराष्ट्रातील अग्रगण्य शिक्षण संस्था पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचा ८० वा वर्धापन दिन तसेच अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालय व हडपसर येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सांगवी ते हडपसर या ३३ किलोमीटर ज्ञानज्योत रॅलीच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सहसचिव (प्रशासन) ए.एम. जाधव, प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, प्राचार्य डॉ. पंडित शेळके, उप प्राचार्य डॅा. लतेश निकम आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत असताना पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सहसचिव (प्रशासन) ए.एम. जाधव यांनी ज्ञानज्योत रॅली आयोजित करण्यामागे असलेले उद्देश व महत्व स्पष्ट केले. तसेच ८० व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने आजपर्यंत केलेल्या प्रगतीचा थोडक्यात आढावा घेत वर्धापन दिनानिमित्त बाबुरावजी घोलप महाविद्यालयाने आयोजित केलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल महाविद्यालयाचे कौतुक केले.