शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड (दि.११ डिसेंबर) :- जगामध्ये आॅनलाईन शिक्षण पध्दती ही मुख्य प्रवाहात असणारी बाब असून मागील काही वर्षापासून भारतात या नव्या शिक्षण पध्दतीमुळे काळाची व वेळेची ती आता गरज बनली असल्याचे प्रतिपादन भारती विद्यापीठाचे माजी कुलसचिव ॲड दिनकरराव शिंदे यांनी आज येथे केले.
एनएमआयएमएस( NMIMS) या जागतिक पातळीवर गेली चाळीस वर्षे नावाजलेल्या विद्यापीठाशी सहकार्य करत असलेल्या लर्नेज सोल्युशन्स या संस्थेच्या कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर ,येथे झालेल्या या कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण क्षेत्रातील दिर्घ अनुभव असलेले जोग एज्युकेशन ट्रस्टचे ग्रुप डायरेक्टर डाॅ तुषार दगडे पाटील, डीएसटीए एज्युकेशन फाऊंडेशनचे संचालक प्रमोद मुंगी, एनएमआयएमएसचे विभागीय व्यवस्थापक निखिल भोसले, माजी नगरसेवक व चंद्ररंग ग्रुप या बांधकाम कंपनीचे संचालक शंकर जगताप , स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी, उद्योजक सुयोग सपकाळ, इलाईट ग्रुपचे चेअरमन सदाशिवराव बोराटे ,लर्नेज चे मॅनेजिंग सीईओ भास्कर मर्गज आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या भाषणात ॲड शिंदे यांनी, कोरोना नंतरच्या बदलेल्या शैक्षणिक स्तरावर आता पारंपरिक शिक्षण पध्दतीनेही कात टाकली असल्याचे नमूद केले.
जोग एज्युकेशन ट्रस्टचे संचालक डाॅ दगडे पाटील यांनी, ‘जगाची परिभाषा बदलण्याची ताकद आॅनलाईन शिक्षण पध्दतीमध्ये असून हि पध्दती आता अविभाज्य भाग बनत चालली असून तुमच्या वेळेनुसार शिक्षण यामुळे अनेकांची शैक्षणिक स्वप्ने पूर्ण होणारा हा प्रवाह असल्याचे स्पष्ट केले.
तर आपल्या प्रास्ताविकपर मनोगतात भास्कर मर्गज यांनी, तळागाळातील तसेच खेडयातील विद्यार्थ्यांना आॅनलाईन शिक्षण प्रवाहात जोडण्याचा मानस त्यांनी व्यक्त करून देशात व देशाबाहेरही आॅनलाईन शिक्षणाला जोडणारे जाळे निर्माण करण्याचा संकल्प त्यांनी केला.
या प्रसंगी प्रमोद मुंगी, शंकर जगताप, विलास मडिगेरी यांचीही भाषणे झाली. विश्वनाथ मर्गज व संध्या मर्गज या माता पित्यांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ह.भ.प. विजय बोत्रे पाटील यांनी केले तर चंद्रशेखर हरिहरन यांनी आभार मानले.