शबनम न्यूज | ११ डिसेंबर :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार साहेब यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ पत्रकार आणि राष्ट्रवादी मासिकाचे संपादक डॉ. सुधीर भोंगळे यांनी शरद पवार यांच्या काही निवडक भाषणांचे संकलन केलेले “नेमकचि बोलणें” या ग्रंथाचे प्रकाशन आज संपन्न झाले.
शरद पवार यांनी १९८८ ते १९९६ या काळात केलेल्या नेमक्या ६१ भाषणांचा संग्रह नेमकचि बोलणें या ग्रंथात करण्यात आला आहे. या प्रकाशन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत, प्रमुख पाहुणे रंगनाथ पठारे, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे अर्थतज्ज्ञ विजय केळकर उपस्थित होते. तर शरद पवार यांच्या काही निवडक भाषणांचे अभिवाचन या कार्यक्रमात पत्रकार अनंत बागाईतकर, कलाकार व कवि किशोर कदम, लेखिका मनस्विनी लता रविंद्र, अभिनेत्री चिन्मयी सुमित, कलाकार संदीप मेहता आणि शंभू पाटील यांनी केले.
लेखक डॉ. सुधीर भोंगळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, आदरणीय साहेबांच्या भाषणाचा हा पहिला खंड आहे. माझ्याकडे साहेबांच्या भाषणांचा समावेश असलेल्या जवळपास ४०० ते ५०० डायऱ्या आहेत. पूर्वी नेते जी भाषणे करत असत ती भाषणे मी जशीच्या तशी लिहून घेत असे. यापुढील काळात उर्वरीत भाषणाचेही खंड प्रकाशित करु, असे त्यांनी सांगितले. तर या कार्यक्रमातील मान्यवरांचे स्वागत माजी आमदार हेमंत टकले यांनी केले. डॉ. सुधीर भोंगळे यांनी पहिल्या खंडासाठी जो कालखंड निवडला आहे, त्या काळात पवार साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते. देशाचे केंद्रीय सरंक्षण मंत्री होते. तसेच देश आणि महाराष्ट्र एका महत्त्वाच्या वळणावरुन जात होता. त्याकाळात पवार साहेबांनी उद्धृत केलेले महत्त्वपूर्ण विचार पुढच्या पिढीपर्यंत जात असल्याबद्दल हेमंत टकले यांनी समाधान व्यक्त केले.