शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०३ एप्रिल) :- शेती आणि शेती उत्पादन प्रक्रिया उद्योग व्यवसायात रोजगारांच्या अनेक संधी आहेत. हे कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे प्रकर्षाने जाणवले. शेती उद्योगात उत्पादन, विपणन, प्रक्रिया, विक्री अशा अनेक विभागातून खुप मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते. सरकार, गुंतवणूकदार, शेती उत्पादक जमीनदार, कुशल प्रशिक्षित मनुष्यबळ आणि तंत्रज्ञान यांची योग्य सांगड घातल्यास शेती आणि शेतीपुरक व्यवसायातूनच भारत आणि महाराष्ट्र ‘ॲग्री हब’ म्हणून उदयास येईल. महाराष्ट्रात उत्तम हवामान आणि शेती योग्य जमीन आहे. परंतू शेतीकडे पाहण्याचा तरुणांचा दृष्टीकोन नकारात्मक आहे. यामध्ये बदल करुन शेतीला सिंचन, उच्च माहिती तंत्रज्ञान आणि संशोधनाची जोड दिल्यास भारत जागतिक महासत्ता होऊ शकतो असा विश्वास माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.
गुरुवारी (दि. ३१ मार्च) पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) निगडी येथील पुणे बिझनेस स्कूल (पीबीएस) मध्ये ॲग्रीवाईज २०२२ (AgriWise 2022) या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी हर्षवर्धन पाटील बोलत होते. यावेळी साखर आयुक्त शेखर गायकवाड, कृषी व अर्थतज्ञ डॉ. परशराम पाटील, सह्याद्री फार्मचे आबासाहेब काळे, ॲग्रोस्टार सितांशु शेठ, दिपक फर्टिलायझरचे विनीत सिंग, जॉन डिअर कंपनीच्या अभिजित परळीकर, सिजेंटा कंपनीच्या दिपाली रजनी, धानुका ऍग्री टेकचे घनश्याम इंगळे, देवयानी पवार, कॉर्पोरेट ट्रेनर तुप्ती जाधव, पीबीएस संचालक डॉ. गणेश राव आणि पीबीएसच्या अधिष्ठाता डॉ. मंजू पुनिया चोप्रा आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला होता.
यावेळी हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले की, शेती क्षेत्रामध्ये अधिक उत्पन्न आणि पैसा मिळवणे शक्य आहे. त्यामुळे पुणे बिझनेस स्कूलच्या वतीने ‘अॅग्रीवाईज २०२२’ हा प्रकल्प हाती घेतला आहे. यातून शेती क्षेत्रातील रोजगारांच्या विविध संधी आणि आर्थिक विकासाचा सक्षम मार्ग देशापुढे मांडला जाणार आहे. शेती क्षेत्रात पुरक संशोधन, कुशल मनुष्यबळाची कमतरता आणि शासकीय धोरणांच्या अंमलबजावणीचा अभाव आहे. पुढील काळात या क्षेत्रात आमुलाग्र आधुनिक बदल होणार आहेत. आधुनिक कृषी क्षेत्राकडे उद्योग, व्यवसाय अशा दृष्टीकोनातून पाहिले तर यातील संधी दृष्टीपथात येतात. महाराष्ट्र कृषी क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेच परंतू आणखी सक्षमता येण्यासाठी धोरणात बदल आवश्यक आहे. कोरोना काळात शेतकरी ते ग्राहक असा थेट संपर्क झाल्यामुळे शेतक-यांना फायदा झाला. यामध्ये नविन तंत्रज्ञानाचा भरपूर वापर झाला. केंद्र सरकारच्या कृषी क्षेत्र आणि छोट्या – मोठ्या शेतक-यांसाठी २० कोटी रुपयांपर्यतच्या अनेक अनुदान कर्ज योजना आहेत. त्यामुळे आर्थिक गुंतवणीची अडचण भासणार नाही. नाम (National Agriculture Mission), एनएमएसए (National Mission Of Sustainable Agriculture) आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, प्रधानमंत्री कृषि बीमा योजना, ग्रामीण बंधारा योजना, शीतगृह उभारणी, मासेमारी व मत्स्योत्पादन योजना अशा अनेक योजना शेतक-यांसाठी आहेत. त्याचा लाभ घेऊन आगामी काळात छोटे – मोठे शेतकरी समूह शेती करतील. जर परदेशी कंपन्या येथे येऊन प्रक्रिया उद्योग, विपणन आणि वितरण व्यवस्था तयार करुन पैसा कमवितात तर आपल्याला ते का शक्य नाही. त्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ आणि संशोधन उभारण्याचे काम पुणे बिझनेस स्कूल (पीएसबी) मधून करण्यात येईल. शेती क्षेत्रामुळे भारत जागतिक महासत्ता होईल असा विश्वास माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.
साखर आयुक्त शेखर गायकवाड विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हणाले की, साखर उत्पादनात भारत जगात दुस-या क्रमांकावर आहे. साखर क्षेत्राला आधुनिकतेची जोड दिल्यामुळे हे शक्य झाले आहे. बगॅस, इथेनॉल, सीबीजी (कॉंम्प्रेस बायो गॅस) याचा उपयोग इंधन म्हणून केला जातो. उत्तर भारतात आता लाखो ट्रॅक्टर सीबीजीवर चालविले जातात. त्यामुळे इंधनाची आयात कमी होत आहे. पर्यायाने परकी चलन वाचत आहे. आपल्या देशात शेती क्षेत्राला पुरक प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध झाल्यास ईस्त्राईल प्रमाणे शेती करणे शक्य आहे. त्यामुळे पाणी, वीज, औषधे यांची बचत होऊन उत्पादनात वाढ होईल आणि वाढलेली शेती उत्पादने निर्यात करता येतील. पारंपरिक शेती करण्याऐवजी जगात ज्या उत्पादनांची गरज आणि मागणी आहे ती उत्पादने घेऊन निर्यात वाढवता येईल. मी सांगलीचा जिल्हाधिकारी असताना तेथे पन्नास वर्षांपुर्वी लोप पावलेल्या नदिचे पुनरुज्जीवन केले. त्यामुळे तेथे नदिला आणि परिसरात पाणी वाढले. त्याचा चांगला परिणाम म्हणजे पुणे – मुंबईत रोजगारासाठी गेलेले २८ हजार नागरिक पुन्हा आपआपल्या गावांकडे परतले. नैसर्गिक उपलब्ध संसाधनांचा उत्तम वापर आणि त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यामुळे हे शक्य झाले. वेगवान विकास आणि मोठ्या प्रमाणात रोजगार देणारे शेती क्षेत्र आहे. शेतीबरोबरच शेती पुरक व्यवसायातून, बहु उत्पन्न शेतीतून गाय, म्हैस, शेळी यांच्या उत्पन्नातून शेतक-यांचा आर्थिक स्थर उंचावतो. शेतकरी आत्महत्येला हा पर्याय ठरु शकतो. १७० वर्षात पहिल्यांदाच जागतिक पातळीवर या वर्षी शिक्षणात मुला, मुलींचे प्रमाण समान झाले आहे. त्यामुळे नोकरी व्यवसायात स्पर्धा असली तरी रोजगारासाठी निव्यर्सनीपणा आणि प्रामाणिकपणाला खूप महत्व आहे असेही शेखर गायकवाड म्हणाले.