शबनम न्युज | पुणे
गंगाखेड-परळी महामार्गाच्या रुंदीकरणासाठी गंगाखेड शहरात वडाची झाडे तोडली जात होती. पण शूटिंगच्या निमित्ताने गंगाखेडमध्ये आलेल्या सिनेकलावंत सयाजी शिंदे यांना ही बाब कळताच त्यांनी ७० वर्षांपेक्षा अधिक जुन्या असलेल्या या दोन्ही वडांचे पालकत्व स्वीकारले. त्यांना जीवदान देण्यासाठी त्यांचे पुनर्रोपण केले जाणार आहे.
यासंबंधीची प्रक्रिया सुरू केली असून गुरुवारपासून जेसीबीने वृक्षांच्या आजूबाजूला मोठे खोदकाम करण्यात येत असून महिन्याभरात शास्त्रीय रित्या पुनर्रोपण करण्यात येईल.
सह्याद्री देवराई ‘ संस्थेच्या माध्यमातून महिनाभरात दोन्ही वड काढून त्यांचे महामार्गापासून काही अंतरावर पुनर्रोपण केले जाईल. सध्या त्या झाडांच्या फांद्या कापून वजन कमी करण्यात आले असून त्यांच्या मुळांना औषध टाकले गेले आहे. वृक्षांच्या पुनर्रोपणाची प्रक्रिया काही दिवसांपूर्वी सुरू झाली. सयाजी शिंदे गंगाखेडमधील एका हॉटेलमध्ये थांबले होते. हॉटेलशेजारी मशीनच्या साहाय्याने वृक्ष कापले जात असल्याचे भल्या पहाटे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी धावत येऊन संबंधित लोकांना अडवण्याचा प्रयत्न करेपर्यंत वडाचे एक झाड खाली कोसळले होता. त्यांनी तत्काळ बांधकाम विभागाकडे विचारणा केली तेव्हा गंगाखेड-परळी महामार्गाच्या रुंदीकरणासाठी लातूरच्या एका कंपनीला कंत्राट देऊन ३२० झाडे तोडली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर शिंदे यांनी सह्याद्री देवराई ‘ या त्यांच्या सहकाऱ्यांशी बोलून दोन वृक्ष वाचवण्याचा निर्णय घेतला. महिन्याभरात त्यांचे पुनर्रोपण केले जाईल.
परभणीतही धावले सयाजी शिंदे !
परभणी जिल्ह्यात वाटूर-चारठाणा रस्ता कामासाठी रस्त्यालगत असलेली झाडे तोडली जात असल्याची माहिती मिळताच वृक्षप्रेमी तथा प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी गुरुवारी चारठाणा परिसरात धाव घेत ती झाडे वाचविण्यासाठी पुढाकार घेतला.
वाटूर फाटा ते चारठाणा या २७ कि.मी. सिमेंट रस्ता कामासाठी रस्त्यालगतची जवळपास ५० वर्षापासूनची झाडे तोडण्याची मोहीम संबंधित कामाच्या कंत्राटदाराने हाती घेतली होती. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या जिंतूर येथील जागरुक नागरिक मंच, झाड फाऊंडेशन व चारठाणा येथील गुड मॉर्निंग ग्रुपच्या ग्रुपच्या सदस्यांनी बुधवारी या झाडांना वाचविण्यासाठी मानवी साखळी तयार केली होती. स्थानिक वृक्षप्रेमींची ही धडपड कानावर पडल्यानंतर वृक्षप्रेमी तथा अभिनेते सयाजी शिंदे यांनी धाव घेऊन पुनर्रोपणाची पावले उचलली.
झाडे वाचली तर आपणही वाचू, हाच महाराष्ट्र दिनाचा संदेश : सयाजी शिंदे
झाड आहे तर वाढ आहे. कार्बन डाय ऑक्साईड घेऊन माणसाला ऑक्सीजन देण्याची, अन्न देण्याची किमया फक्त झाडांकडे आहे. म्हणून झाडे सर्वश्रेष्ठ आहेत. मे महिन्यात झाडांचे महत्व आपल्याला कळते.रस्ता रुंदीकरणात जाणारे वृक्ष वाचवायला हवेत. वडाची दोन झाडे वाचवण्यासाठी प्रशासनाशी बोलणे झाले आहे. प्रशासनातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांशी व्हीडीओ कॉन्फरन्सींग द्वारे चर्चा केली जात आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर सर्वत्र मोठ्या प्रमाणात हा उपक्रम राबवणे शक्य होणार आहे. शेवटी झाडे वाचली तर आपणही वाचणार आहोत, हाच माझा महाराष्ट्र दिनाचा संदेश आहे, असे सयाजी शिंदे यांनी सांगितले.