शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
श्रीक्षेत्र देहू शहरामध्ये प्रशासन वतीने कचरा व्यवस्थापन व कचरा डेपो यांचे योग्य प्रकारे व्यवस्थापन होत नसल्याने शहरात अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे कचरा व्यवस्थापन व कचरा डेपो हे योग्य पद्धतीने कार्यन्वयी व्हावे, अशी मागणी प्लास्टिक प्रदूषण विरुद्ध लढा देणारी संस्था सेव अर्थ वतीने श्रीक्षेत्र देहू नगरपंचायत चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे संस्थेच्या संचालिका प्रियंका तिडके यांनी केली आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे कि, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी, कर्मभूमी व वैकुंठ भूमी असणाऱ्या श्रीक्षेत्र देहूतील नागरिक गेली कित्येक वर्षे कचरा व्यवस्थापन योग्य पद्धतीने होत नसल्याने अनेक समस्यांनी त्रस्त झाले आहेत, पिंपरी चिंचवड महानगरपालिका व चाकण एमआयडीसीला लागून असल्याकारणाने व जगद्गुरु तुकारामची पवित्र भूमी असल्याने अलीकडील काही वर्षांमध्ये श्रीक्षेत्र देहू परिसरातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. या परिसरात असणारे रोजगार, नोकऱ्यांची उपलब्ध झालेली संधी तसेच उद्योग व्यवसायामुळे महाराष्ट्राच्या विविध भागातील लोक देहू मध्ये जागा विकत घेऊन स्वतःची घरे बांधून स्थायिक झाले आहेत. आज श्रीक्षेत्र देहू परिसराची लोकसंख्या ही सुमारे ४० हजारांपेक्षा जास्त आहे. त्या लोकसंख्येच्या मानाने मूलभूत सुविधांची मात्र शहरात वनवा आहे. अनेक समस्या आज देहूकर नागरिकांना भेडसावित आहेत. पण या सर्व समस्यांमध्ये कचऱ्याची समस्या ही आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आहे. या कचरा व्यवस्थापनाबाबत प्रशासनाने योग्य तो निर्णय घ्यावा, शहरातील समस्या अनेक प्रकारच्या आहेत यामध्ये कचरा डेपो रस्त्यालगत असणे त्यामुळे कचरा रस्त्यावर येणे तसेच पालखी सोहळा व तुकाराम बिज यासाठी विविध ठिकाणाहून येणाऱ्या लोकांना या कचऱ्याचे दर्शन होते. पावसाळा सोडून इतर वेळी त्याची व्यवस्थापन न होता तो पेटवला जातो. या कारणाने मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण होते. यामुळे मोठ्या प्रमाणात परिसर दूषित होतो व नागरिकांच्या आरोग्यास त्यामुळे धोका निर्माण होतो. या सर्व गोष्टी पाहता प्रशासनाने योग्य पावले उचलावी व श्रीक्षेत्र देहू शहरातील कचरा व्यवस्थापन योग्य पद्धतीने कार्यान्वित करावा, अशी मागणी सेवार्थ संस्थेच्या वतीने प्रियंका तिडके व शीतल सितप यांनी केली आहे.