शबनम न्युज | मुंबई
राज्यातील दारिद्ररेषेखाली ६० लाख महिलांना एक रुपया नाममात्र किमतीमध्ये दरमहा दहा सॅनेटरी नॅपकिन उपलब्ध करून दिले जाणार आहेत. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव वर्षानिमित्त या योजनेची अंमलबजावणी १५ ऑगस्ट पासून सुरू होणार आहे,अशी माहिती ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. २८ मे जागतिक मासिक पाळी दिनाचे औचित्य ठेवून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज ही घोषणा केली आहे.
एका नॅपकिनची अंदाजे किंमत ४ रुपये गृहीत धरल्यास आणि ६० लाख लाभार्थी यांचा विचार करता २०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. याकरिता ग्रामविकास विभागाच्या अर्थसंकल्पात तरतूद केली असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले.
“मासिक पाळीवेळी घेण्याची काळजी व सफाईतील कमी कमतरता यामुळे जगभरातील आठ लाख महिलांचा मृत्यू झाला आहे. स्त्रियांच्या मृत्यूतील हे सर्वात मोठे पाचवे कारण आहे. भारतात ३२० दशलक्ष मासिक पाळी होणाऱ्या स्त्रियांपैकी केवळ १२ टक्के स्त्रिया सॅनिटरी नॅपकिन वापरतात. महाराष्ट्रात ६६ टक्के स्त्रिया याचा वापर करतात. राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे स्थान तेरावे आहे. ग्रामीण भागात त्याच्या वापराचे प्रमाण साडेसतरा टक्के इतके आहे,” असे हसन मुश्रीफ म्हणाले.