शबनम न्युज | पिंपरी
“मनाचे श्लोक, हायकू यांचा प्रभाव सुमारे 400 वर्षापासून आहे, त्याप्रमाणेच माधुरी काकडे यांनी काव्यविश्वात मधुसिंधू काव्यप्रकार आणून एक क्रांतीच केली असून ह्या मधुसिंधू काव्यप्रकाराचा प्रभाव आगामी काळात शेकडो वर्षे राहू शकेल. मात्र प्रतिभावंतांनी हा प्रकार हाताळताना केवळ तंत्र न सांभाळता, त्यातील आशयघनतेचा आत्मा हरवणार नाही या दृष्टीने सातत्याने भान ठेवावे लागेल. मनाचे श्लोक, हायकू ,गझल हे प्रकार कुठल्याही काळाशी साधर्म्य साधू शकल्याने त्यात शाश्वत काव्याची क्षमता जशी आहे, त्याप्रमाणेच मधुसिंधू काव्यप्रकारातही आहे “, असा विश्वास पहिल्या विश्व काव्यसंमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी प्रकट केला.
विश्व मधुसिंधू संस्थेतर्फे नुकतेच पहिले आंतरराष्ट्रीय निमंत्रित कवयित्रींचे ऑनलाईन मधुसिंधू काव्यसंमेलन आयोजित करण्यात आले होते, सदर काव्यसंमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात डाॅ.मधुसूदन घाणेकर बोलत होते. या संमेलनात भारतासह अमेरिका,जर्मनी,इंग्लंड, सिंगापूर, दुबई या देशातील सुमारे 25 निमंत्रित कवयित्रींनी मधुसिंधू काव्य सादर केले. याच सोहळ्यात डाॅ.मधुसूदन घाणेकर
संपादित डहाळी विशेषांकही प्रकाशित करण्यात आला. समारोपात मधुसिंधू काव्यगौरव तसेच आंतरराष्ट्रीय मधुसिंधू काव्यगौरव पुरस्कार निमंत्रित कवयित्रींना प्रदान करण्यात आले. उद्घाटक डाॅ.योगेश जोशी, प्रमुख अतिथी राष्ट्रपती पदक विजेत्या पोलिस उपअधीक्षक सुरेखा दुग्गे आणि ज्येष्ठ साहित्यिक, निसर्ग प्रेमी डाॅ.प्रतिभा झगडे यांना मधुसिंधू.काव्यसंवर्धन
पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मधुसिंधू.काव्यप्रकाराच्या देशविदेशात अनेक मधुसिंधूकार घडवण्याच्या मौलिक योगदानासाठी मधुसिंधू काव्याच्या प्रवर्तक कवयित्री माधुरी मगर-काकडे यांना वर्ल्ड लिटरेचर संस्थेतर्फे संमेलनाध्यक्ष कवी डाॅ.मधुसूदन घाणेकर याच्या शुभहस्ते ‘ आंतरराष्ट्रीय मधुसिंधू सुवर्णकमळ’ पुरस्काराने ऑनलाईन सन्मानित करण्यात आले.
गीतांजली सटाणेकर यांनी ईशस्तवन सादर केले. सुप्रिया केळकर आणि शर्वरी कुलकर्णी यांनी स्वागत नृत्य सादर केले. प्रास्ताविकामधे विश्व मधुसिंधू संस्थेच्या अध्यक्षा प्रवर्तक मधुसिंधूकार यांनी मधुसिंधू विषयक सविस्तर माहिती दिली. 22 अक्षरात बांधलेल्या या प्रकारात यमकासह प्रगल्भ काव्यलेखन अपेक्षित असल्याचे माधुरी काकडे यांनी सांगितले.
उदघाटक डाॅ.योगेश जोशी यांनी कुसुमाग्रज, मंगेश पाडगांवकर, शांता शेळके, वसंत बापट, इंदिरा संत, सुरेश भट, चंद्रशेखर गोखले आदींच्या काव्यरचनांवर प्रकाशझोत टाकत कमीत कमी शब्दात प्रभावी आशयाचे दाखले दिले. आदर्श सुसंस्कृत समाज घडवण्यासाठी साहित्यिकांनी सतत कार्यरत रहावे असे आवाहन सुरेखा दुग्गे यांनी आपल्या भाषणात सांगितले.
माधुरी काकडे ह्या स्वतःबरोबर साहित्यातील महिलांचेही सबलीकरणाचे यशस्वी कार्य करीत असल्याबद्दल डाॅ.प्रतिभा झगडे यांनी माधुरी काकडे यांचे विशेष अभिनंदन केले.
आघाडीच्या युवा कवयित्री प्रतिमा काळे आणि राजश्री वाणी मराठे यांनी संपूर्ण सोहळ्याचे बहारदार सूत्रसंचालन केले.
रेवती साळुंके यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाची तांत्रिक बाजू सांभाळण्यात विशाल कांबळे यांनी विशेष सहकार्य केले.
मधुसिंधू काव्यसंमेलन गाजवणा-या कवयित्री –
सरला वायकर(दुबई), कविता महाजन (इंग्लंड), आसावरी महाजन(जर्मनी), प्रतिक्षा नांदेडकर(सिंगापूर), अमेरिकेतील सुरेखा हरपाळे, तनुजा प्रधान, नीला पाटणकर, आरती शिवपुजे, छाया पाडलोसकर , तसेच प्रिती भिसे(बंगलोर), सुनेत्रा देशपांडे(छत्तीसगड), भाग्यश्री बागड(गुजरात), सुनीता फडणीस (गोवा), वत्सला पवार-पाटील (परभणी), सुरेखा बिबवे(कोपरगाव), शालिनी दिवाण(पुणे), अपर्णा कुळकर्णी(नागपूर), संजीवनी कुलकर्णी(लातूर), साधना कपाळे(नागपूर), अनिला मुंगसे(आळंदी देवाची), डाॅ.मृदुला कुलकर्णी(पुणे), आशा पाटील(धुळे), स्वप्निला पंडित(नाशिक), शशिकला सुराणा(चिंचवड), आशा बर्वे(पनवेल) आदि कवयित्रींनी मधुसिंधू.काव्यसंमेलन गाजवले.