शबनम न्युज | नवी दिल्ली
आज दिल्ली मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला. दिल्लीचा दौरा ही सदिच्छा भेट असून आम्हाला दिल्लीतील सर्वच नेत्यांनी शुभेच्छा देत पाठिशी समर्थपणे असल्याचं म्हटलं. यावेळी, उद्धव ठाकरेंचे परत निवडणुका घ्या, असे आव्हान दिल्यासंदर्भात प्रश्न विचारला असता ते म्हणाले कि, राज्यघटनेप्रमाणेच निवडणुका होतील, शिवसेना-भाजप युतीचं हे मजबूत सरकार आहे. एकीकडे १६४ आमदारांचे मजबूत सरकार आणि समोर ९९ आहेत. १६४ बहुमताचं हे सरकार आहे. त्यामुळे, लोकांनी त्यांची कामे आणि समस्या घेऊन आमच्याकडे यावे. आम्ही लोकांच्या हिताची काम करण्यासाठीच हे सरकार स्थापन केलं आहे, ते आम्ही करत राहू, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
शिवसेना धनुष्यबाण चिन्ह गमावणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत जाहीर भूमिका मांडली आहे. धनुष्यबाण आमचाच आहे. तो आमच्यापासून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, असे ठाकरे यांनी यावेळी एकनाथ शिंदे गटाला खडसावलं. तसेच, मी आजही म्हणतो हिंमत असेल तर पुन्हा निवडणुका घ्या. मध्यावधी निवडणूक व्हायला हवी. मी चुकलो असेल तर जनता मला घरी बसवेल, अशा शब्दात बंडखोर आमदारांना आव्हान दिलं आहे.