शबनम न्युज | शेगाव
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून आज ऑनलाईन साहित्य समूहात सोनेरी पान असलेल्या नागपूर येथील रचियता साहित्य मंचाने रविवार दिनांक ०७ ऑगस्ट रोजी संत नगरी शेगाव येथे राज्यस्तरीय महाकाव्य संमेलनाचे आयोजन केले आहे.
या साहित्य संमलेनाला प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्राचे हास्यसम्राट डॉ मिर्झा रफी अहमद बेग यांची आणि मातृमहिमा साहित्य समूहाचे संस्थापक व सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण दादा मालपुरे यांची उपस्थिती लाभणार असून या संमेलनाच्या निमित्ताने तब्बल शंभर साहित्यिकांना साहित्य मंच उपलब्ध करून देणाऱ्या रचियता साहित्य मंचाच्या प्रथम राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मुंबई ठाणे येथील सुप्रसिद्ध कवयित्री शालिनीताई काशीकर या भूषविणार आहेत.उद्घाटक म्हणून पनवेल येथील सुप्रसिध्द कवी आणि पत्रकार श्री अशोकजी घरत यांना निमंत्रित करण्यात आले आहे. संपूर्ण आयोजनाची जबाबदारी समूह अधिकारी व संस्थापक अध्यक्ष श्री गोपाल दादा फुलउंबरकर यांनी आपल्या केंद्रीय समितीच्या सदस्यांसह व समन्वय समिती सदस्यांसह स्वीकारली आहे. तर स्वागताध्यक्ष म्हणून भंडारा येथील कविवर्य श्री वामन दादा गुरवे यांची उपस्थिती लाभणार आहे.
अवघ्या तीन वर्षांत साहित्याचे शिवधनुष्य पेलण्याची कामगिरी करणाऱ्या रचियता साहित्य मंचाने यापूर्वी नागपूर येथे २०१९ मध्ये जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते. तर २०२० मध्ये भंडारा येथे दुसरे जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते. रावणवाडी भंडारा, कळंब यवतमाळ आणि डोंगरगड छत्तीसगड येथे अनुक्रमे पहिली दुसरी आणि तिसरी काव्य सहल आयोजन करून उत्तम प्रतिसाद मिळवला होता.
याव्यतिरिक्त रचियता साहित्य मंचातर्फे ऑनलाईन गणेशोत्सव आणि ऑनलाईन नवरात्रोत्सव साजरा करणे, विविध प्रकारची ऑनलाईन संमेलने आयोजित करणे, जिल्हास्तरीय काव्य मैफिल घेणे, ग्रामीण भागात मराठी साहित्याचा प्रचार करणे असे नानाविध उपक्रम समूह सातत्याने राबवित आहे.तसेच साहित्य विश्वात अगदी नवीन असलेला रचियता चारोळी प्रीमियर लीग हा उपक्रम तब्बल तीन वर्षांपासून अत्यंत सुनियोजित व उत्तम रित्या समूहात राबविला जातो आहे.
या राज्यस्तरीय साहित्य संमेलनात रचियता समूहात नित्य लेखन करून उत्कृष्ट साहित्य सेवा करणाऱ्या साहित्यिकांना २०२२ चे विविध पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
त्यात समूहाचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व पुरस्कार समूहाच्या कोषाध्यक्ष भंडारा येथील सौ अर्चना वामनजी गुर्वे यांना तर वाशिम येथील दीपक फुलउंबरकर यांना रचियता रसिक श्रोता पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
रचियता जीवन गौरव पुरस्कार २०२२ हा मुंबई येथील शालिनी ताई काशीकर आणि पनवेल येथील श्री अशोक घरत यांना तर रचियता साहित्य गौरव पुरस्कार कामगार कवी लिलाधर दवंडे व बारामती येथील सौ प्रज्ञा ताई ढमाळ यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे.
रचियता साहित्य युवा गौरव पुरस्कार कु सानिका येवले मुंबई यांना संमेलन स्थळी देण्यात येणार आहे तसेच स्व. कमलेश इंदोरकर यांना मरणोपरांत जाहीर करण्यात आला आहे.
समूहात साप्ताहिक उपक्रमात उत्तम निवेदनाची कामगिरी सांभाळणाऱ्या सौ सुवर्णा ताई अहिरराव, सौ अर्चना ताई गुरवे, सौ रुपाली ताई बोंद्रे, सौ योजनगंधा ताई जोशी तसेच मोहिनी ताई निनावे व सौ स्वाती सेलोकर यांना २०२२ चा रचियता निवेदिका पुरस्कार जाहीर करण्यात आला असून या संमेलनात मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे.
अगदी नावीन्यपूर्ण आणि आठवडाभर विविध उपक्रम राबवून मराठी साहित्याची सेवा करणाऱ्या रचियता समूहाचा डंका आज भारताबाहेर सुद्धा वाजतो आहे. दोन्ही समूह मिळून आज रचियताचे तब्बल १२००पेक्षा अधिक सदस्य आहेत, ही रचियता समूहाच्या सातत्याचे यश आहे.
या साहित्य संमेलनाला जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन संमेलनातील एकापेक्षा एक कवितांचा आस्वाद घेता श्री गजाननाचा आशीर्वाद मिळवावा, अशी विनंती समूह संस्थापक अध्यक्ष श्री गोपाळ फुलउंबरकर यांच्यासह,सौ.प्रतिमा अरुण काळे कार्यकारिणी सदस्य व इतर सर्व सदस्यांनी केली आहे.