रयत विद्यार्थी विचार मंच मावळ तालुका कार्यकारणीची मागणी
शबनम न्यूज | पुणे
पवन मावळातील कोथुर्णे गावातील स्वरांजली जनार्दन चांदेकर या अल्पवयीन मुलीवर झालेले अत्याचार प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येऊन सदर प्रकरणासाठी विशेष सरकारी वकील ऍड.उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी रयत विद्यार्थी विचार मंच मावळ तालुका कार्यकारणीच्या वतीने मा.तहसीलदार मधुसूदन बर्गे साहेब यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, पवन मावळातील कोथुर्णे गावातील दुसरीत शिकणाऱ्या ७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे दिनांक २ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी ३:३० वाजता अपहरण करण्यात आले. यानंतर मुलीच्या पालकांनी कामशेत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करून घेतला. व पोलिसांनी योग्य रीतीने तपास केल्यावर हि मुलगी कोथुर्णे गावातील जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे संशयित रित्या मृत अवस्थेत मिळाली. पोलिसांच्या कार्यक्षेतेमुळे २४ तासाच्या आत आरोपीला जेरबंद करण्यात यश आले.
सदर प्रकरणामुळे पूर्ण मावळ तालुक्यात भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण असुन सर्व नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. तरी आपण या प्रकरणात आदेश देऊन कसून चौकशी करून आरोपीना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करावे तसेच पीडित मुलींच्या पालकांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून ते कायदेशीर लढाई लढण्यासाठी ते असमर्थ आहेत तरी आपण सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून या प्रकरणात विशेष सरकारी वकील मा. उज्वल निकम साहेब यांची नियुक्ती करावी, असे सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी मावळ तालुका प्रमुख अतुल वाघमारे,महासचिव विक्रांत शेळके,मावळ तालुका उपाध्यक्ष सागर गायकवाड,मावळ तालुका कार्याध्यक्ष पूजा गायकवाड,मावळ तालुका सहसचिव धनश्री पवार,मावळ तालुका सदस्य अजय यादव उपस्थित होते..