शबनम न्युज | पुणे
आरती प्रभू यांच्या कवितेचा , लेखनाचा जन्म वेदनेतून झाला. ते संवेदनशील कवी होते. कविता भोगायची , वाचायची असते हे आरती प्रभू यांनी शिकवले , असे प्रतिपादन डॉ. माधवी वैद्य यांनी केले.
रसिक मित्र मंडळातर्फे ‘ एक कवी, एक भाषा ‘ उपक्रमांतर्गत ‘ कवी आरती प्रभू ‘ या विषयावर डॉ. माधवी वैद्य यांच्या व्याख्यानाचे आयोजन शुक्रवार,१२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता करण्यात आले होते. हा कार्यक्रम पत्रकार भवन, नवी पेठ येथे झाला.
डॉ. वैद्य म्हणाल्या, ‘ आरती प्रभू यांची प्रतिमांची भाषा आणि शब्द सामर्थ्य अफाट होते. त्यांच्यात आत्मविश्वास जबरदस्त होता. अपरिक्वतेकडून परिपक्वतेकडे जाणारा त्यांच्या प्रवास होता. चिं. त्र्यं.खानोलकरांचा जीवनपट म्हणजे नियतीचा सारीपटच होता असे म्हणावे लागेल. क्षणात प्रतिभेचे तेजनृत्य तर क्षणात विक्षिप्त स्वभावाची कतृत्त्वावर मात , असा नियतीचा सतत चाललेला खेळ त्यांना सातत्याने अनुभवावा लागला.
श्री. पु. भागवत , मंगेश पाडगांवकर , मधु मंगेश कर्णिक , विजय तेंडुलकर यांच्यासारख्या प्रतिभावंत मित्रांनी खानोलकरांच्या प्रतिभेचा चमत्कार ओळखून त्यांना सतत मदत केली.
सतत कवितेच्या धुंदीत वावरणारा हा माणूस ‘ रात्र काळी घागर काळी ’ सारखी कादंबरी लिहितो आणि हरी नारायण आपटे अभ्यासवृत्ती मिळवतो. ‘ अजगर ’सारख्या कादंबरीवर अत्र्यांसारख्याचे आसूड खातो. केवळ अभिजात प्रतिभेने ‘ एक शून्य बाजीराव ’ सारखे नाटक त्यांनी लिहिले. कोंडूरा कादंबरी, चानी , ही कांदबरी मोहात टाकते. अजब न्याय वर्तुळाचा जर्मनीपर्यंत पोहचते आणि नाट्यसृष्टीत एक चमत्कार घडतो.
रसिक मित्र मंडळाचे संस्थापक सुरेशचंद्र सुरतवाला यांनी प्रास्ताविक केली. प्रदीप निफाडकर यांनी डॉ. माधवी वैद्य यांचा परिचय करून दिला. विं .दा . करंदीकर यांच्या कन्या जयश्री काळे यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.