‘सायबर गुन्हे : जागृती आणि प्रतिबंधात्मक उपाय’वर चंद्रशेखर सावंत यांचे व्याख्यान
शबनम न्युज | पुणे
“फिशिंग ईमेल, अनोळखी लिंक्स, स्पूफिंग, मॉर्फिंग, फेक कॉल, मेसेज यासह कृत्रिम बुद्धिमतेच्या साहाय्याने इंटरनेट युजरकर्त्यावर पाळत ठेवून सायबर गुन्हे होतात. सायबर गुन्ह्यांपासून वाचण्यासाठी आपली खासगी माहिती, ओटीपी, एटीएम पिन इतरांना शेअर करणे टाळावे. सावधगिरीने वागत आपल्या सर्व प्रकारच्या खात्याना सुरक्षित पासवर्ड ठेवणे हाच सायबर गुन्हेगारीला आळा घालण्याचा उपाय ठरेल,” असे मत गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक यांनी व्यक्त केले.
‘आझादी का अमृतमहोत्सव’च्या औचित्याने सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट संचालित सूर्यदत्त इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायबर सेक्युरिटीतर्फे (एसआयआयसीएस) ‘सायबर गुन्हे : जागृती व प्रतिबंधात्मक उपाय’ या विषयावर सावंत बोलत होते. प्रशासकीय सेवा आणि सायबर गुन्हेगारीबाबत जागृतीपर केलेल्या कार्यासाठी सावंत यांना ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या हस्ते ‘सूर्यभूषण राष्ट्रीय पुरस्कार २०२२’ने सन्मानित करण्यात आले. प्रसंगी ‘सूर्यदत्त’च्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, प्रा. अंजली मुळीक, प्रा. प्रशांत पितालिया, सायली देशपांडे आदी उपस्थित होते.
शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक, ज्येष्ठ नागरिक, भागधारक यांच्यासह जवळपास १००० लोकांनी या व्याख्यानाला उपस्थिती लावली. ‘सूर्यदत्त’च्या सोशल मीडियावरून हे व्याख्यान थेट प्रक्षेपित करण्यात आले. त्यामुळे त्याचा लाभ हजारो लोकांना झाला. अतिशय माहितीपूर्ण असलेले हे व्याख्यान आपल्यालाही https://www. youtube.com/watch?v=obpg_LcY- 34 या लिंकवर विनामूल्य ऐकता येईल.
गेल्या चार वर्षात सायबर सुरक्षेवर विविध मार्गदर्शन सत्र, राष्ट्रीय परिषदा झाल्या आहेत. त्यात ऑल इंडिया अँटी टेररिस्ट फ्रंटचे चेअरमन मणिंदरसिंग बिट्टा, तत्कालीन उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश सरतापे, लेफ्ट. जनरल (नि.) डॉ. डी. बी. शेकटकर, एअरमार्शल (नि.) भूषण गोखले, वरिष्ठ पोलीस अधिकारी संभाजी कदम, जयराम पायगुडे, ऍड. प्रशांत माळी, डॉ. हॅरोल्ड डिकॉस्टा, आयटी तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर, दीपक नाथानी, कैलास काटकर, यांच्यासह विविध कंपन्यातील अधिकारी, सायबर, आयटी क्षेत्रातील तज्ज्ञानी मार्गदर्शन केले आहे.
चंद्रशेखर सावंत म्हणाले, “आपण सगळेजण इंटरनेटशी जोडलेलो आहोत. दिवसेंदिवस इंटरनेटच्या माध्यमातून फसवणूक आणि गुन्हेगारीचे प्रकार वाढत आहेत. अशावेळी यातील धोके ओळखून सुरक्षित वापर कसा करता येईल, याची ज्ञान आपण घ्यायला हवे. इंटरनेटवर कोणतीही गोष्ट मोफत नसते. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी समजून घेत इंटरनेटचा सावधगिरीने वापर केला, तर आपण अशा गुन्ह्यांपासून स्वतःचा बचाव करू शकतो. सायबर आणि माहिती तंत्रज्ञानात झपाट्याने बदल होत आहेत. त्यातून गुन्ह्यांचे प्रकार आणि स्वरूपही बदलत आहेत. अशावेळी या नव्या आव्हानांचा सामना करण्यासाठी अद्ययावत अभ्यासक्रम, तज्ज्ञांची व्याख्याने, कार्यशाळा, जागृतीपर कार्यक्रम आणि परिषदांचे आयोजन व्हावे. सायबर सुरक्षेच्या जागृतीसाठी ‘सूर्यदत्त’कडून राबविण्यात येत असलेले उपक्रम कौतुकास्पद आणि सर्वानांच उपयुक्त असे आहेत.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत सायबर सिक्युरिटी अँड डेटा सायन्समध्ये तीन वर्षाचा बीएस्सी अभ्यासक्रम चालवणारी सूर्यदत्त ही पहिली संस्था आहे. सध्या १५० विद्यार्थी हा अभ्यासक्रम शिकत आहेत. सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी सातत्याने कार्यक्रम राबविण्यात येत असून, ही तिसरे व्याख्यान होते. अशा व्याख्यानांतून ‘सूर्यदत्त’मधील विद्यार्थी आणि शिक्षकांना खूप गोष्टी शिकता येतात. सोशल माध्यमांवर हे व्याख्यान लाईव्ह असल्याने विद्यार्थी, पालक, कुटुंबीय, माजी विद्यार्थी व इतर अनेकांना याचा लाभ घेता आला. त्यातून सायबर सुरक्षेबाबत जागृती झाली. इंटरनेट, सोशल मीडियाचा वापर करताना नेमकी काय आणि कशी काळजी घ्यायची याबाबत सावंत यांनी विस्तृत माहिती दिली.”