शबनम न्युज | पुणे
ज्येष्ठ कादंबरीकार आणि मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ.लक्ष्मीकांत देशमुख यांनी संपादित केलेल्या ‘आंतरभारती’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन संगणकतज्ज्ञ,लेखक अच्युत गोडबोले,संविधान अभ्यासक प्रा.गौतमीपुत्र कांबळे यांच्या हस्ते ४ नोव्हेबर रोजी सायंकाळी पाच वाजता महाराष्ट्र साहित्य परिषद(सदाशिव पेठ) येथे झाले.आंतरभारती ट्रस्ट चे अध्यक्ष पांडुरंग नाडकर्णी हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.डॉ.लक्ष्मीकांत देशमुख , न्या.जी.डी. पारिख(निवृत्त) यांचीही विशेष उपस्थिती कार्यक्रमाला होती.
आंतरभारती चे राष्ट्रीय सचिव डॉ.डी.एस.कोरे,पुणे शाखेच्या अध्यक्ष अंजली कुलकर्णी, प्रा . शमसुद्दिन तांबोळी, डॉ सतीश देसाई, सूर्यकांत कुळकर्णी , प्रा.अविनाश कोल्हे , प्रा. प्रकाश चौधरी,स्वाती दाढे , शरद जावडेकर, चैत्रा रेडकर आदि मान्यवर उपस्थित होते. सविता कुरुंदवाडे यांनी सूत्रसंचालन केले.
यंदाचा आंतरभारती दिवाळी अंक हा ’मूलभूत अधिकार,कर्तव्ये आणि मार्गदर्शक तत्वे विशेषांक’आहे.त्यामुळे ‘ या संवैधानिक मूल्य त्रयींवर अच्युत गोडबोले,प्रा.गौतमीपुत्र कांबळे,डॉ.लक्ष्मीकांत देशमुख यांची व्याख्याने या कार्यक्रमात झाली.
अर्थव्यवस्थेतील विषमता धोकादायक : डॉ. अच्युत गोडबोले
डॉ अच्युत गोडबोले म्हणाले, ‘ आंतरभारती हा दिवाळी अंक वाचनीय असुन सर्वत्र पोचला पाहिजे. अर्थसत्तेच्या केंद्रीकरणाला संविधानात विरोध असून सर्वांना समान संधी देण्याचा उच्चार केला पाहिजे. स्मॉल ,मायक्रो, मिनी, ( एमएसएमई ) हे क्षेत्र नोटा बंदीनंतर संपल्यात जमा आहेत.१ टक्का लोकांकडे ५८ टक्के संपत्ती आहे.कर्जबाजारीपणा समाजात वाढला आहे. संपत्ती आणि उत्पन्नातील विषमता या वेगवेगळया असून ही विषमता वाढत आहे. मुक्त अर्थव्यवस्थेनंतर अनेक गोष्टी बदलत चालल्या आहेत. देश महासत्ता झाला , विश्वगुरू झाला ही भंकस, फसवी चर्चा आहे. आपण शिक्षण, आरोग्याकडे सतत दुर्लक्ष केले आहे.
मुक्त अर्थव्यवस्थेमुळे मध्यम , उच्च मध्यवर्ग प्रगत झाला. पण खालच्या स्तरातील गरीब अधिक गरीब झालेत.मानवी प्रगतीच्या ४२ पैकी ४० मानांकनात (इंडेक्स) भारत मागे आहे. सर्व सरकारांना काळा पैसा बाहेर काढण्यात रस नाही. विषमता संपेपर्यंत आर्थिक प्रगती तळातील वर्गापर्यंत पोचणार नाही. या सरकारच्या काळातही प्रगती झाली आहे, पण ती अपुरी आहे. शिक्षण, आरोग्य, सार्वजनिक वाहतूक, स्वस्त गृह बांधणी,उर्जा अशा क्षेत्रात सरकारने पुढील दहा वर्षे प्रचंड काम केले तर सर्वांना प्रगतीच्या समान संधी मिळतील.