शबनम न्युज | औरंगाबाद, (वृत्तसंस्था)
‘निर्दयी सरकारकडे भावनांचा दुष्काळ अन् केवळ घोषणांची अतिवृष्टी’, अशी टीका शिवसेना पक्षनेते उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर केली आहे. ठाकरे हे औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संवाद साधला. तेव्हा ते बोलत होते. यावेळी ठाकरे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला.तसेच ठाकरेंनी औरंगाबादमधील दहेगावात जाऊन शेतीच्या नुकसानीची पाहणी केली.
यावेळी बोलताना ते म्हणाले, शेतकऱ्यांवर ज्या आपत्ती येतात त्या दोन प्रकारच्या असतात, एक कोरडा दुष्काळ असतो तर एक अतिवृष्टीची आपत्ती असते. हे आपल्या हातात नसते परंतु ही अस्मानी संकटे आल्यानंतर सरकारचे कर्तव्य असते की, शेतकऱ्याला उघड्यावर पडू द्यायचे नाही. त्याचे घरदार उघड्यावर पडता कामा नये. माझी भेट ही प्रतिकात्मक आहे. एका विचित्र अवस्थेत आपण सर्वजण आहोत. एकाबाजूला दिवाळी सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचे दिवाळे निघालेले आहे. दिवळी साजरी तर सोडून द्या पण दिवाळीत कपडे कोणते घालायचे, घरात अन्न काय शिवजवायचे? हा मोठा प्रश्न आपल्या अन्नदात्याला पडलेला आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.