शबनम न्युज | मुंबई
येत्या १ आणि ५ डिसेंबर रोजी गुजरात मधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्यातील पालघर, नाशिक, नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यातील ज्यांची नावे गुजरात राज्यातील मतदार यादीत आहेत त्यांना मतदानासाठी सुट्टी देण्यात आली आहे. असे आदेश राज्य सरकारने दिले आहे. यावरून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ते आज मातोश्रीवर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
ते म्हणाले, गुजरातच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात सुट्टी देण्यात आली. उद्या पाकिस्तानमध्ये निवडणुका असतील तर पूर्ण देशाला सुट्टी जाहीर करणार का? असा असावा उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. “हे महाराष्ट्राचे सरकार आहे की गुजरातचे हे मला समजत नाहीये. येथे बऱ्याच वर्षांपासून गुजराती लोक राहतात. मला त्यांच्याबद्दल आदर आहे. महाराष्ट्रात जेव्हा निवडणूक असते तेव्हा कर्नाटक, मध्य प्रदेशमध्ये सुट्टी असते का? हा काय नवीन प्रकार आहे. उद्या पाकिस्तानच्या निडणुकीसाठी पूर्ण देशात सुट्टी जाहीर करतील,” अशी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी केली.