शबनम न्युज | मुंबई
मुंबईतील रस्ताच्या सिमेंट काँक्रिटीकरणावरुन युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी टीका केली होती, त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पलटवार केला आहे. “ज्या लोकांची हयात फक्त घोटाळे करण्यात गेली, त्यांनाच दुःख होत आहे. काँक्रिटीचे रस्ते केले तर पुढील 40 वर्ष टिकतील आणि नवीन रस्ते होणार नाही, यामुळे त्यांची दुकानदारी बंद होईल, त्यामुळेच त्यांची ओरड सुरू आहे,” असा टोला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला आहे.
उद्या मुंबईतील बीकेसी मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. यासाठी भाजपने जोरदार तयारी केली असून, आज फडणवीस यांनी सभास्थळाच्या कामांची पाहणी केली. यावेळी फडणवीस यांनी येणाऱ्या लोकांची सोय आणि सुरक्षेचाही आढावा घेतला. त्यावेळी फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधत असताना आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं.
ते पुढे म्हणाले, “मी मुख्यमंत्री असताना महापालिकेच्या रस्त्यांची चौकशी झाली होती. 200 रस्त्यांच्या खालील लेअरच गायब होती, अशी माहिती तेव्हा मिळाली आणि हे आम्हाला रस्त्यांच्या मुद्द्यावरुन बोलत आहेत. टक्केवारी ठरली नाही म्हणून त्यांनी रस्त्याचे टेंडर काढले नाही, आम्ही मात्र वर्क ऑर्डर दिले. यांच्या मनात आलं असतं तर त्यांनी 15 वर्ष रस्तेच झाले नसते. त्यांचा भ्रष्टाचार उखडून टाकण्याचं काम मुख्यमंत्री करत आहेत,” असंही यावेळी फडणवीस म्हणाले.