पिंपरी, 16 फेब्रुवारी – मावळ लोकसभा मतदारसंघ दोन जिल्ह्यात विभागलेला असतानाही पायाला भिंगरी लावून खासदार श्रीरंग बारणे मतदारसंघात फिरतात. लोकांची कामे मार्गी लावतात. लोकांमध्ये मिसळतात. पूर्ण मतदारसंघात त्यांनी कामाच्या जोरावर लोकप्रियता मिळविली आहे. ते नागरिकांसाठी चोवीस तास उपलब्ध असतात. सर्वसामान्यांना सहज उपलब्ध होणारा खासदार अशी श्रीरंग बारणे यांची ख्याती असल्याचे, गौरोद्वागार पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काढले.
श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाऊंडेशनच्या वतीने खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त लोकाभिमुख कर्तव्य संपन्न, आदर्श व्यक्तिमत्वांचा आणि संस्थांचा चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात गुरुवारी (दि.16) पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. खासदार बारणे यांचे अभिष्टचिंतनही करण्यात आले. माजी मंत्री विजय शिवतारे, खासदार श्रीरंग बारणे, त्यांच्या पत्नी सरिता बारणे, माजी खासदार, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील, इरफान सय्यद, महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे, माजी खासदार अमर साबळे, भाजपचे संघटन सरचिटणीस अमोल थोरात, विजय फुगे, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर यावेळी उपस्थित होते. खासदार बारणे यांच्या कार्याची चित्रफीत दाखविण्यात आली. महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याचा विशेष सन्मान करण्यात आला.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ”खासदार बारणे नागरिकांना सहज उपलब्ध होतात. त्यांनी शाल, श्रीफळ पुरता वाढदिवस मर्यादीत न ठेवता विविध क्षेत्रात काम करणा-यांचा सन्मान केला. वाढदिवसाला सामाजिक झालर ठेवली. 30 लाखांच्या लोकसंख्येच्या पिंपरी-चिंचवड शहरात संपूर्ण देश दिसतो. शहर उभारण्यात खासदार श्रीरंग बारणे यांचे मोठे योगदान आहे. राजकारणात सतत चढ उतार होत असतात. सातत्याने निवडून येणे अवघड असते. पण, खासदार बारणे सातत्याने निवडून येतात, हे सोपे नाही”.
”आपल्याबद्दल नकारात्मकता निर्माण न होऊ देता सातत्याने विजयी होणे हा त्यांचा मोठा गुण आहे. त्यांचा मावळ लोकसभा मतदारसंघ पुणे आणि रायगड जिल्ह्यात विभागला आहे. ते सातत्याने मतदारसंघात फिरतात. लोकांशी मिसळतात. पूर्ण मतदारसंघात त्यांनी कामाच्या जोरावर लोकप्रियता मिळविली आहे. त्यामुळे दोनवेळा खासदार झाले. महाराष्ट्रातील माणूस दिल्लीमध्ये जायला घाबरतो. भाषेच्या समस्येमुळे ‘न्यूनगंड’ निर्माण होतो. पण, खासदार बारणे ‘न्यूनगंड’ न ठेवता उत्तमपणे हिंदी भाषेत प्रश्न मांडत राहिले. मंत्र्यांच्या पाठीमागे लागून मतदारसंघासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणला. विविध कामे मार्गी लावली. या कामाचा जोरावर त्यांना सलग सातवेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला”, असेही पालकमंत्री पाटील म्हणाले.
माजी मंत्री विजय शिवतारे म्हणाले, ”पिंपरी-चिंचवडचा पाणी प्रश्न सुटण्यासाठी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांनी मोठे प्रयत्न केले. त्यांनी पवना धरणातील गाळ स्व:खर्चाने काढला. त्यामुळे पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत झाली. रावेत बंधा-याच्या वरच्या भागात तीन बंधारे बांधले. त्यामुळे पाणी साठवण क्षमता वाढली. विकास कामे करताना नागरिकांसह शेतकऱ्यांचीही ते काळजी घेतात. खासदार श्रीरंग बारणे यांनी माणसे कमविली. जनतेसाठी सदैव तत्पर असतात. त्यामुळे जनतेचा खासदार अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे”.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ”थेरगावातून पाचवेळा निवडणुका लढलो. लोकांनी नेहमीच साथ दिली. काम करत असताना जनतेचा पाठींबा, प्रेम मिळाले. जनतेच्या पाठींब्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचलो आहे. लोकसभेत सर्वाधिक प्रश्न विचारण्यात माझा पहिला नंबर येतो. मतदारसंघातील प्रश्नांना लोकसभेत वाचा फोडली. स्वातंत्र्य मिळाल्यापासून मावळातील अनेक गावात वीज, रस्ते नव्हते. तिथे वीज पोहोचविली. रस्ते केले. माथेरानची मेट्रो ट्रेन सुरू केली. पिंपरीत पासपोर्ट केंद्र सुरू केले. क्रांतिवीर चापेकर यांच्या नावाने टपाल तिकीट काढले. प्रामाणिकपणे लोकांसाठी काम करत आहे. मागील अडीच वर्षे कामे होत नव्हती. त्यामुळे आम्ही वेगळा निर्णय घेतला. गेल्या सहा महिन्यात 100 कोटी रुपयांचा निधी मावळसाठी मिळाला आहे. कार्ला येथील आई एकविरा देवीच्या परिसराचा विकास होत आहे. याशिवाय वाहतूक कोंडी आणि अपघातांचा ‘ब्लॅकस्पॉट’ होत असलेल्या कार्ला फाटा येथे ओव्हर ब्रीज उभारण्यात येणार आहे. जनतेसाठी निस्वार्थपणे काम करत आहे”.
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, ”देशाच्या संसदेत सर्वाधिक प्रश्न विचारण्याचे ‘रेकॉर्ड’ खासदार श्रीरंग बारणे यांच्या नावावर आहे. ते अभ्यासपूर्णपणे प्रश्नांना वाचा फोडतात. गर्व, मोठेपणा ठेवत नाहीत. सर्वांच्या मदतीला धावून जातात. संयमी स्वभाव आहे. आकांड- तांडव कधी करत नाहीत. मावळ मतदारसंघातील लोकांशी ते समरस झाले आहेत. चंद्रकांतदादा तुम्ही शब्द टाकला तर दिल्लीत बारणे यांना मंत्रिपद मिळेल”.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष धनाजी बारणे, उपाध्यक्ष रवी नामदे, सचिव बशीर सुतार, कार्यवाह विश्वजीत बारणे यांनी परिश्रम घेतले. तर, अमित गोरखे यांना शिक्षण रत्न, मुकुंद कुचेकर यांना समाजभूषण, डॉ. पं. नंदकिशोर कपोते यांना कला गौरव, सुर्यकांत मूथियान -पर्यावरण भूषण, वसंत काटे- उद्योगरत्न, माया रणवरे- दुर्गारत्न, डॉ. नारायण सुरवसे- सेवाभूषण, प्रा. सुनिता नवले-दुर्गारत्न, विजयन -शिक्षणरत्न, शेखर कुटे-वारकरी भूषण, संगीता तरडे-दुर्गारत्न, अमरसिंह निकम-आरोग्य भूषण, वृशाली मरळ- आधारभूषण, संतोष कनसे-श्रमिक भूषण, आलम शेख, भगवान मुळे -समाजभूषण, जयदेव म्हमाणे -क्रीडारत्न, प्रमोद शिवतरे -समाजभूषण, अनिल साळुंखे-समाजरत्न आणि शुंभकर को-हौसिंग सोसायटीला आदर्श भूषण सोसायटी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
(फोटो ओळ - श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाऊंडेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात वाढदिवसानिमित्त खासदार बारणे यांचे पालकमंत्री पाटील यांनी पुष्पगुच्छ देवून अभिष्टचिंतन केले. यावेळी डावीकडून विश्वजीत बारणे, विजय फुगे, बशीर सुतार, रवी नामदे, अमर साबळे, सरिता बारणे, शिवाजीराव आढळराव, विजय शिवतारे, शिवराज राक्षे, इरफान सय्यद, बाळासाहेब वाल्हेकर)