शबनम न्युज | पुणे
निगडी प्राधिकरण, सिंधुनगर येथील सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे मराठी राजभाषा दिनाचा कार्यक्रम उत्साहाच्या वातावरणात पार पडला.
हा कार्यक्रम नवनगर शिक्षण मंडळाचे संस्थापक प्रा. गोविंदरावजी दाभाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.या कार्यक्रमाला मराठी साहित्यातील जेष्ठ साहित्यिक हनुमंत चांदगुडे,जेष्ठ कवयित्री वाणी ताकवणे ,सकाळ NIE अंकाचे उप – संपादक विशाल सराफ, विद्यालयाच्या प्राचार्या साधना दातीर,उप-प्राचार्य विजय बच्चे,पर्यवेक्षक प्रदीप काळोखे ,पर्यवेक्षिका सौ.कोकीळा आहेर हे उपस्थित होते.
” प्रत्येक विद्यार्थ्याने कविता निर्मिती करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.स्वतःच्या मनातील भावभावनांना व्यक्त करण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे कविता.आपल्या मनातील विचार वहीमध्ये लिहित चला.” असे मत हनुमंत चांदगुडे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.इयत्ता-आठवी च्या पाठ्यपुस्तकातील त्यांच्या आळाशी कवितेच्या निर्मितीची माहिती सांगून कवितेचा आशय स्वभाषेत स्पष्ट केला.
बा अनवाणी पायाचा ठसा मातीत उठतो
भाळावरल्या घामाचा पान्हा नभाला फुटतो………..
नभ पाणी पाणी होतो, माती चिखल होतीया
कुणब्याच्या जीवनाची मग उकळ होतीया
भेगाळल्या भुईकडं बाप पाहून फुटतो
भाळावरल्या घामाचा पान्हा नभाला फुटतो…..
यावेळी विद्यालयाच्या प्राचार्या साधना दातीर यांनीही विद्यार्थ्यांना मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यार्थ्यांच्या काव्यसंमेलनाचे सुद्धा आयोजन करण्यात आलेले होते ज्यात विद्यार्थ्यांनी सुरेल आवाजात अनेक कवितांचे सादरीकरण केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय कांबळे ,सूत्रसंचालन सौ.जयश्री घावटे तर आभार रविंद्र कुवर यांनी मानून कार्यक्रमाची सांगता झाली.