शबनम न्युज | हिंगोली
जनतेसाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ सामान्य माणसापर्यंत पोहोचविण्याचे काम शासन करत आहे. ज्या-ज्या भागात पाऊस पडला त्या-त्या भागातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे अचूक पंचनामे करुन शेतकऱ्याला न्याय देण्याचे काम करण्यात येणार आहे. राज्यात गेल्या सहा महिन्यात नऊ वेळा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली. यामध्ये शेतकरी बांधवाचे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येणाऱ्या कॅबिनेटमध्ये अंतिम निर्णय घेतील. त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.
येथील संत नामदेव कवायत मैदानावर पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला, यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार हेमंत पाटील, आमदार तान्हाजी मुटकूळे, आमदार संतोष बांगर, माजी आमदार संतोष टारफे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार पुढे म्हणाले की, शासनाने केवळ 1 रुपयात विमा हप्ता भरुन पिक संरक्षित करण्याची आगळी वेगळी योजना राबविणारे आपले राज्य हे देशात वेगळे राज्य ठरले असून. यामध्ये शेतकरी बांधवाचा शंभर टक्के वाटा सरकार भरणार आहे. शासनाने यावेळेस घेतलेल्या या निर्णयाचे राज्यातील शेतकऱ्यांनी स्वागत केले असून ज्या योजनांची शेतकऱ्यांच्या बाबतीत घोषणा करण्यात आली होती, त्या सर्व योजनांची अंमलबजावणी सुरु झाली आहे. तसेच स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने शेतकरी अपघात विमा मंजूर करण्यासाठी अडचणी येत होत्या. त्या अडचणी सोडवत थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.