शबनम न्युज | औरंगाबाद
सर्वसामान्य, शेतकरी-कष्टकऱ्यांचे हे सरकार असून त्यांच्या कल्याणाचे विविध निर्णय घेऊन जनतेला न्याय देण्याचे काम हे सरकार करीत आहे. राजपूत समाजाचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे, राजपूत समाजाच्या पुढील ‘भामटा’ हा शब्द काढण्यात येईल आणि केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. दरम्यान, महाराणा प्रतापसिंह हे स्वाभिमानी राजे होते, त्यांनी प्राण पणाला लावून राष्ट्राप्रति असणारा स्वाभिमान जपला. जनतेचा राजा म्हणून ओळख असलेल्या महाराणा प्रताप सिंहांचा इतिहास अजरामर आहे, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी केले.
औरंगाबाद शहरात सकल राजपूत समाजाच्या वतीने आज ‘वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह होते. कार्यक्रमास केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री संदीपान भुमरे, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, सहकार मंत्री अतुल सावे, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, आमदार जयकुमार रावल आदी मान्यवर उपस्थित होते.