शबनम न्युज | जळगाव
जिल्हास्तरीय महारोजगार मेळाव्यात युवकांना मोठ्या प्रमाणात नोकरीची संधी उपलब्ध होत असून अशा रोजगार मेळाव्यांचा युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
‘शासन आपल्या दारी’ अभियांनातर्गत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव येथे आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय जिल्हास्तरीय रोजगार मेळावा संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. या मेळाव्यास जिल्हाधिकारी अमन मित्तल, मुख्यमंत्री जन कल्याण कक्षाचे राज्य मुख्य समन्वयक डॉ. अमोल शिंदे, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त वि. जा. मुकणे, नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य एल. पी. देशमुख यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच मोठया संख्येने विद्यार्थी मेळाव्यास उपस्थित होते.
यावेळी बोलतांना पालकमंत्री पाटील म्हणाले की, शासन आपल्या दारी अभियांनातंर्गत राज्यात जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केन्द्रामार्फत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबिराच्या माध्यमातून रोजगारास इच्छुक नवयुवकांना नव कौशल्य, प्रशिक्षण व रोजगारांची संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या देशामध्ये तरुणांना सर्वांत मोठा भेडसावणार प्रश्न म्हणजे नोकरी. आज येथे शिबिरात ज्या ज्या कंपन्यानी युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करुन दिली आहे. या मेळाव्यात उमेदवारांना आपल्या पसंतीच्या क्षेत्रात नोकरीची संधी आहे. युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा.