शबनम न्यूज – वृत्तसंस्था , प्रतिनिधी :
उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांचा शिवसेनेत प्रवेश झाला आहे. हा आज एक ऐतिहासिक आहे. कारण त्यांच्या प्रवेशाला देवेंद्र फडणवीसही उपस्थित आहेत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. शिवसेना-भाजपा युती किती मजबूत आहे आणि किती मनापासून झाली आहे ते आजच्या प्रवेशामुळे स्पष्ट झालं आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचं सरकार, युतीचं सरकार आपण आणलेलं आहे. बाळासाहेब ठाकरे, प्रमोदजी महाजन, अटलजी सगळ्यांना अभिप्रेत असलेली युती आपण केली आहे. केंद्रात भाजपाची सरकार आहे. त्याच धर्तीवर युती सरकार स्थापन व्हावं ही सगळ्यांचीच इच्छा होती असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
वर्षभरापूर्वी आमचं सरकार आल्यानंतर आम्ही राज्यात धडाकेबाज निर्णय घेतले. राज्यात युतीचं सरकार स्थापन व्हावं ही लोकांची इच्छा होती. आम्ही जे काम करतो आहे ते लोकांना पसंत पडतं आहे. संपूर्ण राज्यात आमच्या निर्णयांची चर्चा आहे. ज्यांना टीका करायची आहे त्यांना करुद्या आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही असाही टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.
पदाधिकारी, आमदार, खासदार आमच्या बरोबर येत आहेत. खूप मोठ्या प्रमाणावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी आमच्याकडे येत आहेत. मनिषाताईही आपल्याकडे आल्या. घटनात्मक उपसभापती असलेल्या नीलम गोऱ्हे यादेखील आपल्या बरोबर आल्या. त्यांनी महिलांच्या उत्कर्षासाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. लोकप्रतिनिधी जो असतो त्याला लोकहिताचं काम करण्याची इच्छा असते त्याच भावनेतून नीलम गोऱ्हे आमच्या बरोबर आल्या आहेत असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.