शबनम न्युज | पुणे
स्वातंत्र्यदिननिमित्त १५ ऑगस्ट रोजी घरोघरी तिरंगी झेंडे लावण्याचा संकल्प केला जात असून ‘ हर घर तिरंगा ‘ संकल्पाच्या अंमलबजावणीमध्ये चीन वरून तयार झालेले झेंडे वापरून देश प्रेमाला गालबोट लावू नये, असे आवाहन भारत फ्लॅग फाउंडेशनने केले आहे. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गिरीश मुरुडकर,कार्यकारी अध्यक्ष राहुल भालेराव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात हे आवाहन करण्यात आले आहे.
भारतामध्ये सर्वसामान्य कारागीर, गरीब कुटुंबे, छोटे कारखानदार ध्वज निर्मिती करत असतात. बचत गटांमध्ये महिला हे काम करतात. चीन मधून आलेल्या झेंड्यांमुळे त्यांच्यावर परिणाम होऊ शकतो. अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था ,सामाजिक संस्था मोफत ध्वज वाटप करत आहेत. त्यांनी देखील ध्वज चीनमधून आलेले नाहीत याची खात्री करावी. भारतीय ध्वज संहितेतील नियमआणि इतर माहिती असलेली पत्रके भारत फाउंडेशन- ‘मुरुडकर झेंडेवाले ‘ यांच्याकडे मोफत मिळू शकेल.पायदळी जाणारे ध्वज गोळा करण्यासाठी बॉक्स सुद्धा मोफत मिळतील. भारत फ्लॅग फाउंडेशन,795,बुधवार पेठ,इलेक्टरीक मार्केट,मुरूडकर वाडा,मोती चौक,पुणे 411002,दूरध्वनी:-9822013292 येथे संपर्क साधण्याचे आणि विधायक मोहिमेत सर्वांनी सामील व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
सोशल मीडिया स्टेटस साठी संदेश
“चिनमधून आयात केलेले तिरंगा ध्वज कोणी विकू नये ,खरेदी करू नये, कारण हा राष्ट्रीय अस्मितेचा प्रश्न आहे.” वरील संदेश नागरिकांनी डीपी, स्टेटस म्हणून सोशल मीडियावर ठेवावा ,असे आवाहन देखील फाउंडेशनने केले आहे.