नारायणगाव – केंद्र सरकारच्या कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के निर्यात शुल्क लागू करण्याच्या निषेधार्थ खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली दि.२२ रोजी सकाळी ९ वाजता आळेफाटा येथे महाविकास आघाडीचे आंदोलन होणार आहे. शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवणाऱ्या निर्णयाच्या विरोधात निषेध करण्यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले आहे.
केंद्र सरकारच्या धरसोड धोरणामुळे गेली काही वर्ष कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सातत्याने फटका बसतो आहे. कांद्याला चांगला दर मिळण्याची स्थिती निर्माण झाली की, कधी निर्यात बंदी तर कधी निर्यात शुल्कात भरमसाठ वाढ करुन शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवायची हे धोरण केंद्र सरकार सातत्याने राबवीत आहे. कांदा उत्पादक त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे, याकडे लक्ष वेधून खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, संसदेत आपण शेतकऱ्यांना हमीभाव देत असल्याची व शेतकऱ्यांच्या सन्मानाची भाषा वापरतं, मात्र कथनी आणि करणी यात मोठा फरक असल्याचे खासदार डॉ. कोल्हे म्हणाले.
आधीच पावसाने ओढ दिल्याने शेतकरी संकटात आहे. त्याला दिलासा देण्याऐवजी केंद्र सरकारने ४० टक्के निर्यात शुल्क वाढवून शेतकऱ्यांशी द्रोह केला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील ४० टक्के निर्यात शुल्क लागू करण्याचा निर्णय तत्काळ मागे घ्यावा, यासाठी आळेफाटा येथे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उध्दव ठाकरे गट) व काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीच्यावतीने शेतकरी रास्ता रोको आंदोलन करुन केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध करणार आहेत. या आंदोलनात जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर, हवेली, पारनेर, संगमनेर आदी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सरकारचा निषेध करावा, असे आवाहन खासदार डॉ. कोल्हे यांनी केले आहे.