शबनम न्यूज | प्रतिनिधी :
सरसकट मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा करणारा अध्यादेश राज्य सरकारने काढावा, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलं होतं. बुधवारी राज्य सरकारकडून यासंदर्भात काही निर्णय घेण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेतलं जाणार का? याची चर्चा चालू होती. मात्र, आंदोलन चालूच राहणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केलं आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी बोलताना राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयासंदर्भात माहिती दिली. “काल सरकारने काही निर्णयांसंदर्भात घोषणा केल्या आहेत. त्या निर्णयांची प्रत अद्याप आपल्यापर्यंत आलेली नाही. माध्यमांमधून काही ठराविक माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे. पण सरकारकडून अधिकृत जीआर आलेला नाही. सरकारनं काल एक निर्णय घेतलाय.. ज्या मराठा समाजाकडे कुणबी असल्याच्या नोंदी असतील, त्यांना कुणबी जात प्रमाणपत्र आजपासून दिले जातील”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मराठा समाजाला सरसकट जात प्रमाणपत्र द्यावेत ही आपली मूळ मागणी आहे. त्यावर मराठा समाज आंदोलन करत आहे. ज्यांच्याकडे नोंदी असतील, त्यांना कुणबी जात प्रमाणपत्र दिली जातील असा निर्णय झालाय. पण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली. ती समिती महिन्याभरात अहवाल देणार. त्यानंतर निर्णय घेतला जाईल”, असंही मनोज जरांगे पाटील यांनी नमूद केलं.