शबनम न्युज | मुंबई (वृत्तसंस्था)
देशातील तरुणांनी स्वत:मधील कौशल्य विकसित करावे. तसेच स्वयंरोजगार करताना अन्य तरुणांना रोजगार उपलब्ध करून देत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करावे, असे आवाहन कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी येथे केले.
महाराष्ट्र स्टेट इनोव्हेटिव्ह सोसायटी व अर्थ स्कूल ऑफ इंटरप्रीनरशीप यांच्या संयुक्त विद्यमाने आज सायंकाळी महाराष्ट्र स्टार्टअप ॲक्सलरेशन समारोप कार्यक्रमात मंत्री श्री. लोढा बोलत होते. यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन., अर्थ स्कूल ऑफ इंटरप्रीनरशीपचे संस्थापक हरी टी.एन.,राज्य नाविन्यता सोसायटी चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद शिंदे होते.
लोढा म्हणाले की, व्यवसाय निवडताना आपल्या आवडीच्या क्षेत्रातच करिअर करावे. मात्र, ते करताना सुरुवातीच्या काळात नफा किंवा तोट्याचा विचार न करता सातत्य महत्त्वाचे आहे. भविष्याचा वेध घेऊन रोजगार सुरू केल्यावर आवश्यक तेथे त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घ्यावी. आपल्या उत्पादनाचे मार्केटिंग करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने प्रशिक्षण घ्यावे. यावेळी आयुक्त डॉ. रामास्वामी, ‘अर्थ’चे संस्थापक श्री. हरी यांनी मार्गदर्शन केले.
‘महाराष्ट्र स्टार्टअप ॲक्सलरेशन कार्यक्रम‘
कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीने अर्थ स्कूल ऑफ इंटरप्रीनरशीपच्या सहकार्याने ‘महाराष्ट्र स्टार्टअप अॅक्सलरेशन कार्यक्रम’ सुरु केला आहे. या कार्यक्रमात ४ दिवस व्यावसायिक क्षेत्रात यशस्वी ठरलेल्या संस्थापक आणि तज्ञाद्वारे मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष स्वरूपात समस्या सोडविण्याचे सत्र आयोजित करण्यात आले आहे. त्यानुसार मुंबईत (दि. ५ ते ८ ऑक्टोबर, २०२३), पुणे (दि. १३-१६ डिसेंबर, २०२३) आणि नागपूर (दि. २८ फेब्रुवारी ते २ मार्च २०२४) या तीन शहरांमध्ये हे सत्र आयोजित केले जातील. प्राथमिक टप्प्यातील स्टार्ट अपच्या संस्थापकांना स्केलिंगच्या सामान्य आव्हानांना सामोरे जाण्यासाठी माहिती देणे आणि साधने प्रदान करणे हे या कार्यक्रमाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे.