शबनम न्युज | मुंबई (वृत्तसंस्था)
राजमल लखीचंद ज्वेलर्सचे मालक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ईडीने त्यांच्याकडून 315 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.
ईडीकडून जळगावातील राजमहल लखीचंद ज्वेलर्स वर ऑगस्ट महिन्यात छापेमारी करण्यात आली होती. या कारवाईदरम्यान, ईडीने तब्बल 1 कोटी रुपयांची रोकड आणि 29 किलोंची सोने आणि हिऱ्यांचे दागिने जप्त केले होते. या दागिन्यांची किंमत तब्बल 25 कोटी रुपयांच्या घरात आहे. आता ईडीने राजमल लखीचंद ज्वेलर्सच्या विविध मालमत्तांवर टाच आणली आहे. ईडीकडून त्यांच्या जंगम व स्थावर अशा 70 मालमत्तांची जप्त करण्यात आली आहे.
जळगाव, नाशिक, ठाणे येथील शोरूम मधून रोख रकमेसह सोन्याचा साठा जप्त करण्यात आला होता. आता ईडीने आर.एल. समूहाची अनेक ठिकाणची संपत्ती देखील जप्त केली आहे. राजमल लखीचंद ज्वेलर्स लिमिटेडच्या बँक फसवणूक प्रकरणात ईडीने ही कारवाई केलेली आहे. या सर्व मालमत्तेचे मूल्य रुपये 315.60 कोटी एवढे आहे. दरम्यान, आर एल गोल्ड प्रा. लि. आणि मेजर्स मनराज ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यावर पीएमपीएल 2002 कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.