शबनम न्युज | धुळे
भगवान बिरसा मुंडा जोडरस्ता योजनेच्या माध्यमातून आदिवासी जिल्ह्यातील आतापर्यंत वाहतूक आणि दळणवळणाच्या साधनापासून दूर राहिलेले पाडे, वस्त्या, बारमाही जोडरस्त्यांनी जोडली जाणार असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी केले.
साक्री तालुक्यातील उंबरखडवा येथे अर्जुनसागर ॲग्रो प्रोड्युसर कंपनी मार्फत आयोजित बचत गट व भेव्य शेतकरी मेळाव्याच्या कार्यक्रमात डॉ. गावित बोलत होते. या कार्यक्रमास खासदार डॉ.हिना गावित, जि.प.सदस्या सुमित्रा गांगुर्डे, खंडु कुवर, विश्वनाथ बागुल,पंचायत समिती कृषी अधिकारी रमेश नेतनराव,सरपंच संदीप चौरे, हिना बोरसे, गोटू माळाचे, मधुकर भदाणे, प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील, इजिनिंअर मोहन सुर्यवंशी, विक्की कोकणी, चंद्रकांत पाटील, के.टी.सुर्यवंशी, माजी सदस्य मधुकर बागुल, माजी पं.स.सदस्य राजेंद्र सताळे,भिका जगताप अर्जुनसागर ॲग्रो प्रो.कंपनीचे अध्यक्ष पिंटु अहिरे, यांच्यासह सरपंच, उपसरपंच, विविध सोसायटीचे चेअरमन, महिला बचत गटाचे अध्यक्ष, पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री डॉ. गावित म्हणाले, राज्यातील सर्व आदिवासी वाडे, पाडे, गावे रस्त्याने जोडण्यासाठी शासनाने भगवान बिरसा मुंडा जोडरस्ते योजना सुरु केली आहे. या योजनेतंर्गत आदिवासी उपयोजना क्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्र, आश्रमशाळा, अंगणवाडी, सरकारी संस्था, तसेच ज्या गावाला वाड्याला पाड्याला अद्याप रस्ते नाही अशा ठिकाणी रस्ते तयार करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. येत्या दोन वर्षात सर्व गाव, पाड्यातील रस्ते तयार करण्यात येणार असून हे रस्ते कमीत कमी पाच वर्षे चांगले टिकतील असे दर्जेदार करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्यात. केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून जलजीवन मिशन योजनेसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून येत्या काळात ज्या भागात वीज पुरवठा, नवीन रोहित्र बसविणे, नवीन सबस्टेशन करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या भागातील शेतीला बारमाही पाणी देण्यासाठी या भागातील जेवढे नदी, नाले आहेत त्यावर साखळी बंधारे कसे बांधता येईल याचा सर्व्हे करण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले आहे. यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.
प्रत्येकाच्या शेतात पाणी पोहचविण्याचे शासनाचे नियोजन असून येत्या काळात वरच्या भागात उपसा सिंचन योजना तयार करुन या भागातील शेतीसाठी प्रत्येकांच्या शेतात पाणी पोहचून शेतीचे उत्पन वाढविण्याचे प्रयत्न केले जाईल. पाणी उपलब्ध झाल्यावर येथील शेतकऱ्यांनी राष्ट्रीय फलोत्पादन योजनेच्या माध्यमातून शेडनेट, पॉली हाऊसचा लाभ घ्यावा. गतवर्षी 275 शेडनेट साक्री, शिरपूर व नंदुरबार तालुक्यात देण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. शेडनेटच्या माध्यमातून अधिक चांगले उत्पन्न घेवून शेतकऱ्यांना आपली आर्थिक परिस्थिती सुधारता येईल यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.