शबनम न्युज | पुनावळे
पुनावळेमध्ये प्रस्तावित वन विभागाच्या जागेमध्ये पर्यावरणाचा ऱ्हास करून होणारा कचरा डेपो तसेच व्यवस्थापन प्रकल्प रद्द करण्यात यावा, अशी मागणी ठाकरे गटाचे युवानेते सुरज गजानन बाबर यांनी भूपेंद्र यादव, (केंद्रीय मंत्री,पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन विभाग , भारत सरकार), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्री गुलाब राव पाटील, यांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, पिंपरी चिंचवड शहरातील तमाम जनतेच्या वतीने मी आपणास विनंती करू इच्छितो की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने वन विभागामार्फत 22 एकर जागा कचरा डेपो तसेच व्यवस्थापनासाठी ताब्यात घ्यायची प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये आहे असे माध्यमांमधून समजते , मुळात हा प्रकल्प येथे करायचा याकरिता 2008 मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आरक्षण टाकण्यात आले, परंतु आज जर आपण पाहिले तर पंधरा वर्ष यास होऊन गेले असून सध्या जर वास्तविकता पाहिली तर या ठिकाणी सभोवतालच्या परिसरात जवळजवळ मोठमोठ्या टोलेजंग इमारती, मॉल, पब्लिक स्कूल, रहिवासी वस्ती झाल्या आहेत, सदर प्रकल्प झाल्यास व वन विभागाची जागा महानगरपालिकेने ताब्यात घेतल्यास शेकडो, हजारो झाडांची कत्तल येथे होईल यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे व याचा विपरीत परिणाम मानव जीवनावर झाल्याशिवाय राहणार नाही याची आपण गांभीर्याने दखल घ्यावी ही आमची आपणास नम्र विनंती आहे.
माननीय महोदय, या प्रस्तावित जागेच्या जवळच इमारती झाल्या असून त्या बफर झोनच्याआत मध्ये येत आहेत आवश्यक तेवढा बफर सोडला गेला पाहिजे, झाडांची कत्तल होता कामा नये आज आपण एकीकडे झाडे लावा, झाडे जगवा असे सांगतो दुसरीकडे मात्र आपण एखाद्या प्रकल्पासाठी शेकडो हजारो झाडे तोडतो हे कितपत योग्य आहे ?? याचा आम्हाला आपण खुलासा करावा. असे केल्यास पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर वृक्ष तोडण्याचा गुन्हा दाखल करावा.
माननीय महोदय आपण जर पाहिले तर कोणतीही जागा निवडताना त्याला निकष असतात, जागा निवडताना अभ्यासात असे आढळून आले की, लँडफिल साइट निवडीसाठी जलस्रोतांपासून अंतर आणि मातीचा पोत हे सर्वात महत्त्वाचे निकष आहेत. प्रस्तावित पद्धत निर्णय घेणाऱ्यांना संभाव्य पर्यावरणीय परिणाम लक्षात घेऊन लँडफिल डेव्हलपमेंटसाठी योग्य ठिकाणे ओळखण्यात मदत करू शकतात.
लँडफिल साइट अशा ठिकाणी नसावी जिथे जमीन भरण्याची जागा आणि लोकसंख्या यांच्यातील योग्य बफर झोन उपलब्ध नाहीत .
लँडफिल साइट निवडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे घटक म्हणजे भूजल खोली, पृष्ठभागावरील पाण्याचा परिसर, उंची, जमिनीचा उतार, मातीची पारगम्यता, मातीची स्थिरता, पूरसंवेदनशीलता, लिथोलॉजी आणि स्तरीकरण, दोष, जमिनीचा वापर प्रकार, जवळपासच्या वसाहती आणि शहरीकरण, सांस्कृतिक आणि संरक्षित जागा याचाही आपल्या द्वारे विचार केला गेला पाहिजे.
आपण जर महाराष्ट्र शासन पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग शासन निर्णय क्रमांक घकव्य/ २०११/प्र.क्र २८८/पापु २२ मंत्रालय मुंबई ४०००३२ यांचा दिनांक 5 ऑक्टोबर 2012 चा शासन निर्णय पाहिल्यास आपल्या असे लक्षात येईल की,घनकचरा प्रक्रिया व भूभरणासाठी जागेची निवड ही वरील शासन निर्णय मधील परिशिष्ट -१ अनुसार करावी आपण जर परिशिष्ट -१ बघितले तर त्याच स्पष्ट दिले आहे की घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी जागा निवडताना त्या जागेबाबत भविष्यात वादविवाद होऊ नयेत यासाठी स्थानिक स्तरावर विचारविनिमयकरून जागेची निवड स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावी.
त्याचप्रमाणे घनकचरा प्रक्रिया व भूभरणासाठी जागेची निवड करताना ही जागा रहिवासी परिसर, विमानतळ , जंगल, पाण्याचे स्त्रोत ऐतिहासिक धार्मिक स्थळे इत्यादी पासून पर्याप्त अंतरावर असावीत.
उपरोक्त जर आपण पाणीपुरवठा विभागाचे जर संदर्भ घेतले तर आपल्या लक्षात येईल की सध्या स्थितीला सभोवताली रहीवासीकरण झाल्याने तेथील सर्व स्थानिक नागरिकांनी याला विरोध केलेला आहे. आज जर आपण पाहिले तर विविध संघटना विविध स्तरातील सर्व नागरीक याचा विरोध दर्शवत . त्यामुळे स्पष्टपणे असे दिसते की स्थानिक संस्थां पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या शासनाच्या आदेशाला केराची टोपली देत आहेत.
त्याचप्रमाणे वरील शासन निर्णय यामध्ये दिलेल्या प्रमाणे जंगलापासून अंतर असावे असे नमूद केले आहे आज जर आपण पाहिले तर हा प्रकल्प जंगल तोडूनच करत आहेत ही जागा वनविभागाची आहे यामुळे संपूर्णपणे एकंदरीतच नियम धाब्यावर बसवून महानगरपालिका काम करीत आहे असे स्पष्ट दिसून येते.
डम्पिंग ग्राऊंडवर टाकल्या जाणार्या कचर्यामुळे या भागात प्रचंड दुर्गंधी निर्माण होते. अनेकदा इथला कचरा जाळला जातो किंवा कचर्यातील रासायनिक प्रक्रियेमुळे तो पेटतो. त्यातून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. सभोवताली राहणार्या हजारो लोकांना त्यामुळे श्वसनाचे व अन्य विकार जडतात.
घन कचरा ढिगाऱ्यात फेकण्यामुळे शहर आणि गावं यांचं सौदर्य तर नष्ट होतंच पण त्यामुळे आरोग्यविषयक प्रश्न निर्माण होतात. हे कचऱ्याचे डोंगर रोगजंतूची वाहतूक करणाऱ्या माशा, डास, उंदीर आणि झुरळं यांच्या पैदाशीचे अड्डे बनतात.
आज पुनावळे येथील प्रस्तावित कचरा डेपो याच्या परिसराच्या भोवती आयटी पार्क हिंजवडी, तातवडे, रावेत, वाकड , दत्तनगर, शिदेवस्ती अशा प्रकारचे नागरिकरण/ रहीवासी क्षेत्र झालेले आहे यामुळे वरील त्रास येथील सर्व नागरिकांना होणार असून तसेच त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होणार . पर्यावरणाचा देखील झाडे तोडल्यामुळे ऱ्हास होणार आहे यामुळे आपण पुनावळे येथे होणाऱ्या कचरा डेपो तसेच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला मान्यता देऊ नये व हा प्रकल्प जेथे झाडे नसतील, पाण्याचे स्त्रोत नसतील, रहिवासी क्षेत्रापासून दूर असेल अशा ठिकाणी करावा व अशा ठिकाणीच्या जागेची निवड करावी असे आदेश आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला देण्यात यावेत, असेही सदर निवेदनात सुरज बाबर यांनी नमूद केले आहे.