शबनम न्यूज | मुंबई
राज्यपाल म्हणून अनेक देशांचे राजदूत व वाणिज्यदूत आपणांस भेटावयास येतात. त्यातील काहींना तर हिंदी भाषा देखील अवगत असते. अनेक देशांमधील विद्यापीठांमध्ये हिंदी भाषा विभाग कार्यरत असल्याचे त्यांच्याकडून समजते. दुर्दैवाने आपणच आपल्या मातृभाषांबाबत उदासीन आहोत. हिंदी चित्रपटातील अभिनेते अभिनेत्री नेहमी इंग्रजीतच बोलतात; हिंदी भाषेत बोलण्यास कचरतात, हे दुर्दैवी असल्याचे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.
गृह मंत्रालयाच्या राजभाषा विभागातर्फे आयोजित क्षेत्रीय राजभाषा संमेलनाचे उदघाटन राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, अणुशक्ती भवन, तुर्भे मुंबई येथे गुरुवारी (दि. २३) झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते विविध केंद्रीय संघटना, बँक व उपक्रमांना २०२२- २३ वर्षाचे क्षेत्रीय राजभाषा पुरस्कार प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाला केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा, राजभाषा विभागातील सचिव अंशुली आर्य, राजभाषा सहसचिव डॉ. मीनाक्षी जौली, न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक भुवनचंद्र पाठक तसेच राजभाषा विभागाचे अधिकारी, कर्मचारी, निमंत्रित उपस्थित होते.
अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळा आपल्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना घरी देखील इंग्रजीतूनच संवाद करण्याचे सांगतात. हिंदी किंवा मराठी भाषेत बोलणाऱ्याकडे हीन दृष्टीने पाहिले जाते. परिणामतः मुले आपल्या मातृभाषेत किंवा हिंदीत बोलण्यास कचरतात, असे राज्यपालांनी सांगितले.
आपण राजभाषा संसदीय समितीचे सदस्य म्हणून काम केले आहे, असे नमूद करून जगात भारत एकमात्र देश आहे जेथे आपलीच राष्ट्रभाषा वाचविण्यासाठी समिती नेमावी लागते, असे मत राज्यपालांनी नोंदविले. इस्रायलने हिब्रू भाषा जीवित करुन तिला मातृभाषा बनवले, असे सांगून स्वातंत्र्यानंतर ७६ वर्षांनी देखील हिंदी ही राष्ट्रभाषा न होता राज्यभाषा राहिली, याबद्दल राज्यपालांनी खंत व्यक्त केली.
हिंदी भाषा येत नसेल याचा लोकांना न्यूनगंड येत नाही. परंतु इंग्रजी भाषा येत नसेल तर न्यूनगंड दिसून येतो, असे सांगून देशांतर्गत विमान प्रवासात हिंदीचा वापर केला जावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. लॉर्ड मेकॉले यांनी देशावर थोपलेली वैचारिक गुलामगिरी जावी व हिंदी भाषा लोकभाषा व्हावी यासाठी हिंदी भाषेत इंग्रजीला पर्यायी असे सोपे शब्द उपलब्ध करून द्यावेत, अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.