बाजारात सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेल्या भाजीपाला आणि फळांची भरमार
शबनम न्युज | पिंपरी
उन्नती सोशल फाउंडेशन आणि H.O.M.E. (The Biodynamic World) यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळे सौदागर येथील नागरिकांसाठी प्रति शनिवारी आणि रविवारी आठवडे बाजार भरविण्यात येणार आहे. त्याचे उदघाटन आज शुक्रवारी (दि. ८) रोजी करण्यात आले.
या बाजारात सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेल्या ताज्या, हिरव्या आणी पौष्टिक भाज्या आणि फळे विक्रीसाठी माफक दरात उपलब्ध करून देण्यात आली आहेत. जेणेकरून नागरिकांना पौष्टिक, निरोगी जीवनशैली राखण्यास मदत होईल.
त्याचे उदघाटन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. कुंदाताई भिसे, संस्थापक संजय भिसे, उत्तम धनवटे, आनंद हास्य क्लबचे राजेंद्रनाथ जसवाल, विठाई वाचनालयचे रमेश वाणी, सागर बिरारी, विजय बांगरे,रविंद्र पाटिल, वाल्मिक काटे, बाळासाहेब चौधरी, मधुकर पाटिल,आशिष खाडे, किरण कोतुळकर, माजी नगसेवक अल्का खाडे, संजय शेलार, अॅड. अविनाश खाडे आणि परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आले.
उदघाटनप्रसंगी डॉ. कुंदाताई भिसे म्हणाल्या, सेंद्रिय अन्न म्हणजे कृत्रिम खते किंवा कीटकनाशकांचा वापर न करता शेतात पिकवलेली पिके. सेंद्रिय भाज्यांची चव अधिक समृद्ध आणि चांगली असते. या सेंद्रिय भाज्या तुमच्या आरोग्यासाठी, रोगाचा प्रतिकार करण्यास अधिक सक्षम असतात. सेंद्रिय भाज्या खाण्याने अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, लोह, क्रोमियम आणि मॅग्नेशियमसारखे महत्वाचे घटक शरीराला चांगल्या प्रमाणात मिळतात. त्यामुळे सेंद्रिय भाज्यांची मागणी वाढली आहे. पर्यावरणीय आणि आरोग्यविषयक समस्या सेंद्रिय शेतीमुळे कमी करणे किंवा त्या टाळण्याचा आमचा हेतू आहे, असेहि त्या म्हणाल्या.