शबनम न्युज | लातूर
भारत देश हा तरूणाचा देश म्हणून प्रसिद्ध आहे. भारताचे तरूण जगामध्ये सर्वाधिक हुशार असल्याची माहिती जागतिक सर्वेमध्ये समोर आल्याची माहिती न्यूज मिडीयातून समोर आली आहे. जगामध्ये बराक ओबामा, स्टिव्ह जॉब, भारतीय उद्योजक राममूर्ती, देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व अनेक भारतीय जगातील अनेक महत्त्वाच्या जागेवर कार्यरत आहेत. या प्रभावी उद्योजक व नेत्यांनी आपल्या बौध्दिक संपदेच्या जोरावर संशोधकांनी संशोधन करून शक्ती व संपत्ती मिळविली तर राजकीय क्षेत्रातील नेत्यांनी बौध्दिक संपदेच्या जोरावर अतुलणीय कार्य केले. त्यामुळे सत्ता व संपत्तीपेक्षा बौद्धिक संपदेचा प्रभाव जगावरती अधिक असल्याचे विचार भाजपा नेते तथा किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी मांडले.
यावेळी ते लातूरातील औसा रोड येथील वाडा हॉटेलच्या सभागृहात आयोजित सौ.जयश्रीताई भिमराव शिंदे यांच्या सेवापूर्ती समारोह प्रसंगी बोलत होते. यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. प्रतिभाताई शिवाजीराव पाटील कव्हेकर, पंचायत समिती लातूरचे गटशिक्षणाधिकारी संजय पंचगल्ले, डॉ.दिनकर काळे, सौ.डॉ. सुरेखा काळे मॅडम, माजी प्राचार्य कावळे सर, माजी प्राचार्य बी.एम.शिंदे, सौ.जयश्रीताई भिमराव शिंदे, तहसिलदार हरिदास काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना माजी आ.कव्हेकर म्हणाले की, भारत देश हा भाग्यशाली देश आहे. जेथे प्रभू रामचंद्र, भगवान श्रीकृष्ण, स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंदासारखे अनेक महात्म्ये झाले.ज्यांच्या विचारातून जाती व वर्ग विरहीत जगाचे व मानवाचे कल्याण करणारे विचार सातत्याने दिले गेले. त्यामुळेच परशुरामजी ब्राह्मण असूनही त्रिलोकातील क्रांतीकारी योध्दे होते. महर्षी विश्वमित्र राजे असतानाही सर्वश्रेष्ठ महर्षी झाले. यांचे विचार भारतीय तरूणांमध्ये रूजविण्याचे कार्य देशाच्या पंतप्रधानांनी नवीन शिक्षण पध्दती व प्रभू रामचंद्रजीच्या प्रतिष्ठापनेतून केले असल्याचे मत माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतीज्योती सावित्री फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी डॉ.सौ.सुरेखा काळे, सौ.जयश्रीताई शिंदे यांनी मनोगत मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचल व आभार बाळकृष्ण काळे महाराज यांनी मानले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येनी उपस्थित होती.
भारतीय महिलांनी शिक्षणाच्या माध्यमातून विविध क्षेत्रात परिवर्तन घडविले – सौ. प्रतिभाताई पाटील कव्हेकर
पुरातन काळामध्ये महिलांना सार्वजनिक क्षेत्रात व शिक्षणात सहभागी होण्याची फारशी संमती मिळत नसे पंरतु सावित्रीबाई फुले सारख्या महिलांनी जागृती निर्माण केली व त्यातून महिलांचा सहभाग वाढला महात्मा बसवेश्वर, स्वामी दयानंदासारख्या महात्म्यांनी महिलांना पुढाकार दिला. त्यामुळे महिला विविध क्षेत्रात पुढे आल्या आहेत. मोदी सरकारने महिलांना लोकसभा, विधानसभेत राखीव संधी दिली त्यामुळे महिलांचा सहभाग वाढेल. शिक्षणामुळे महिला विविध क्षेत्रात परिवर्तन घडवित आहेत. असे विचार जिल्हा परिषदेच्या मा.अध्यक्षा सौ. प्रतिभाताई शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी मांडले.