शबनम न्युज | पैठण
मी, सर्वसामान्य कार्यकर्ता असून सर्वसामान्य जनतेचा मुख्यमंत्री आहे. सरकार स्थापनेनंतर दोन महिन्यांत शेतकरी तसेच सामान्य नागरिकांसाठी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. त्यामुळे विरोधकांना धडकी भरली असून, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे,’ असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला.
पैठण येथे आयोजित जाहीर सभा व नागरी सत्कार कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बोलत होते. विरोधकांवर टीका करताना शिंदे म्हणाले की , गेल्या अडीच वर्षांच्या काळात सण-उत्सव होत नसल्यामुळे राज्यातील जनतेचा श्वास कोंडला होता. तो श्वास मोकळा करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आम्ही घेतला. त्यामुळे हे सरकार लोकांच्या मनातले सरकार असून मी जेथे जातो तेथे लोकांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळते. साधा कार्यकर्ता असताना जनतेत होतो. आता मुख्यमंत्री असलो तरी जनतेतच आहे. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना व विचार पुढे नेण्यासाठी सदैव तत्पर आहे.’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.