शबनम न्युज | मुंबई (वृत्तसंस्था)
शास्त्रीय संगीत, नृत्य, नाटक अशा विविध कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या देशभरातील कलाकारांना दरवर्षी संगीत नाटक अकादमी प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित केले जाते. या पार्श्वभूमीवर यावर्षीचा उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कार अभिनेत्री ऋतुजा बागवे हिला जाहीर झाला आहे. तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आलेल्या ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना देखील संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
‘नांदा सौख्य भरे’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलेल्या ऋतुजाने मालिका, चित्रपट, नाटक या तिन्ही माध्यमातून रसिकांचे रंजन केले आहे. अपघातात दोन्ही हात गमावलेल्या जिद्दी तरुणीची भूमिका तिने ‘अनन्या’ या नाटकात केली होती. दोन्ही हात मागे बांधून दीड दोन तासात रंगभूमीवर तिने साकारलेल्या अनन्याला प्रेक्षकांनी भरभरून दात दिली. या भूमिकेसाठी तिला बारा पुरस्कार मिळाले. शिवाय एका भूमिकेसाठी वर्षभरात सर्वाधिक पुरस्कार मिळवल्याचा विक्रमही तिच्या नावावर नोंदवला गेला आहे.
गेली पन्नास वर्ष चतुरत्न अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची करमणूक करणाऱ्या अशोक सराफ यांना नुकतेच महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. आता संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराने हा आनंद द्विगुणीत झाला आहे. महाराष्ट्र राज्य पुरस्कारांसह असंख्य पुरस्कार त्यांना या कला प्रवासात अधिक लाभले आहेत. आता राष्ट्रीय पातळीवरही त्यांच्या कलाकार किर्दीला पुरस्कार रूपाने दाद मिळाली आहे.