शबनम न्युज | मुंबई
“जय जय महाराष्ट्र माझा” हे गीत राज्य गीत म्हणून महाराष्ट्र राज्य सरकारने स्वीकारून एक वर्ष उलटल्यानंतरही या गीताला कोणत्याही शैक्षणिक संस्थेत किंवा शाळेत हे राज्य गीत गायले व वाजवले जात नव्हते. ही बाब मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचे निदर्शनास आले असून, त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून प्रत्येक शैक्षणिक संस्थेत राज्यगीत वाजवले पाहिजे, अशी आग्रही मागणी केली होती. त्यांच्या मागणीला अखेर यश आले असून, मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक पाऊल उचलत 15 मार्च रोजी सदरचे परिपत्रक काढले आहे.
या परिपत्रकानुसार, राज्यातील शाळांमध्ये दैनिक सत्र सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत/ परिपाठ /प्रार्थना /प्रतिज्ञा यासोबत राज्यगीत वाजविले जाईल, अशी सूचना करण्यात आलेली आहे. राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये दैनिक सत्र सुरू होण्यापूर्वी राज्यगीत वाजविले किंवा गायले जाण्याची दक्षता शाळा व्यवस्थापनाने घ्यावी, वरील सूचनाचे पालन राज्यातील सर्व शाळा व्यवस्थापन करतील, याबाबतची दक्षता सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.