शबनम न्युज | आसखेड
गेल्या 25 दिवसांपासून भामा आसखेड धरणातून दररोज 1000 क्युसेकने पाणी सोडत असल्याने धरणातील पाण्याची पातळी अत्यंत कमी झाली असून, भर उन्हाळ्यात तीव्र टंचाई सामोरे जावे लागेल, अशी भीती धरण परिसरातील शेतकरी व नागरिक व्यक्त करत आहे. तर पश्चिम धरणाच्या पश्चिम पट्ट्यात पाण्याची पातळी अतिशय कमी झाल्याने आजच दुष्काळ सदृश्य परिस्थितीत सामोरे जावे लागत आहे.
साधारणपणे धरणात दरवर्षी एप्रिल महिन्यात सरासरी 50% पाणीसाठा शिल्लक असतो, असा अंदाज धरण परिसरातील नागरिकांना असतो. पण यावर्षी धरणाच्या पश्चिम पट्ट्यातील गावातील नागरिकांचा अंदाज चुकल्याने पिके सुकू लागली आहेत. त्यामुळे शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. गतवर्षी सुमारे 50 टक्के पाणीसाठा यादरम्यान भामा आसखेड धरणात होतो. त्यामुळे सुमारे 25 ते 30 किलोमीटर पर्यंत भागात धरणाच्या पश्चिम पट्ट्यातील नदीपात्रालगतच्या गावातून फुगवाट्याचे पाणी होते. परंतु यंदा पाणी विसर्ग सातत्याने झाल्याने पाण्याची पातळी कमी झाली बाधित शेतकरीच अडचणीत आले तर काही भामा आसखेड लगतच्या बाधित गावकऱ्यांची पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट सुरू झाली आहे.
खेड तालुक्यातील भामा आसखेड हे 8.14 टीएमसी चे मातीचे धरण आहे. परंतु त्याचा फायदा खेडपेक्षा शिरूर आणि दौंड तालुक्यातला जास्त होतो. धरणग्रस्त बाधित शेतकरी जमिनी देऊन बेघर होऊ नये, पाण्याच्या सुविधांपासून कायम वंचितच राहिले आहेत आणि त्या शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे शासन दरबारी अद्यापही प्रलंबित असून, या समस्यावर लवकर तोडगा निघावा, असे मत बाधित शेतकऱ्यांनी व्यक्त केले. भामा-आसखेड धरणात सध्या एकूण साठा 76.860 दलघमी उपयुक्त साठा 63.34 दलघमी इतका साठा आहे. परंतु दिनांक 21 मार्चपासून आजतागायत सुमारे 25 दिवस 1000 क्युसेकने नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर धरणात फक्त 29.17% पाणीसाठा आहे.