शबनम न्यूज | मुंबई
मुंबई | प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री, राज्यमंत्री, सर्व खासदार व आमदार आपले एक महिन्याचे वेतन पूरग्रस्त लोकांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले. आज प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ही माहिती पत्रकारांना दिली. सरकार आपल्यापरीने मदत करेल, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आणखी मदत देण्याचा प्रयत्न आम्ही करत असल्याचे ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व खासदार, आमदार आपले एक महिन्याचे वेतन पूरग्रस्त लोकांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार असल्याचे उपमुख्यमंत्री ना. @AjitPawarSpeaks यांनी जाहीर केले. आज पत्रकार परिषदेत अल्पसंख्याक मंत्री ना. @nawabmalikncp यांनी ही माहिती पत्रकारांना दिली. pic.twitter.com/NSnDOXVHaf
— NCP (@NCPspeaks) July 26, 2021
आठ दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे महापूर येऊन कोकण, सातारा, सांगली याठिकाणी अपरिमित हानी झाली आहे. दरड कोसळून जवळपास २५१ लोकांनी आपला जीव गमावला तर १०० हून अधिक लोक बेपत्ता आहेत. मुंबई, पुणे, अमरावती याठिकाणीही पूराने परिस्थिती गंभीर झाली होती. या नुकसानग्रस्त लोकांना एसडीआरएफच्या नियमानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदत जाहीर केली आहे.
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा पूरग्रस्त भागाच्या दौर्यावर आहेत. लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. एनडीआरएफ, नौदल, लष्कर यांची मदत घेऊन बचाव कार्य सुरू आहे, असेही नवाब मलिक म्हणाले. पूरामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये जीव गमावलेल्या मृतांच्या वारसांना ५ लाख रुपयांची घोषणा राज्य सरकारच्यावतीने करण्यात आली आहे. मुंबईत जीव गमावलेल्या लोकांच्या नातेवाईकांना पैसे वाटप झाले आहे, असेही नवाब मलिक यांनी सांगितले.