शबनम न्यूज | मुंबई
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांचे खंडन करत त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सोमय्या यांनी कथित घोटाळ्याबाबत केलेला आरोप इतका बिनबुडाचा आहे की सोमय्यांची सीएची पदवी शंकास्पद आहे. सोमय्यांनी अभ्यास करावा पाहिजे तर मी सीए पाठवतो, असा टोलाही हसन मुश्रीफ यांनी लगावला.
अप्पासाहेब नलावडे कारखान्याच्या घोटाळ्याबाबत किरीट सोमय्या बोलले. मात्र ब्रिक्स इंडिया कंपनीशी माझा व माझ्या जावयाचा सुतरामही संबंध नाही. ब्रिक्स इंडिया कंपनी ही ४४ लाख कॅपिटलची कंपनी आहे, ही शेल कंपनी नाही, त्याचं शेअर कॅपिटल १ लाख आहे, मग १०० कोटींचा घोटाळा कसा होईल? असा प्रश्न मुश्रीफ यांनी केला. २०१२-१३ मध्ये हा कारखाना शासनाने ब्रिक्स फॅसिलिटीला १० वर्षांसाठी सहयोगी तत्वावर चालवायला दिला होता. सोमय्या म्हणतात की २०२० ला दिला. त्यामुळे सोमय्यांनी चुकीचे आरोप करण्याआधी अभ्यास करायला हवा होता, असे मुश्रीफ म्हणाले.
यावेळी मुश्रीफ यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरही निशाणा साधला. पाटील यांनी पुरुषार्थाप्रमाणे लढावे, कुणाचा वापर करुन, माझ्या कुटुंबाची बदनामी करुन काही मिळणार नाही. सगळे आरोप खोटे आहेत, मी १०० कोटींचा दावा ठोकणार आहे, तो दावा तयार होत असल्याचे मुश्रीफ म्हणाले. तसेच किरीट सोमय्यांनी केलेल्या नव्या आरोपांवरदेखील ५० कोटींचा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असे ते म्हणाले.
मी १७ वर्षे मंत्री म्हणून राज्यात काम केले असताना आजपर्यंत एकही डाग नाही. ज्या ज्या खात्यात मी काम केलं, त्या त्या खात्यात चांगलं काम करुन दाखवलं. महाविकास आघाडी सरकारला अस्थिर करण्याचे प्रयत्न यातून सुरू आहेत. चंद्रकांत पाटील यांनी घोटाळा केला आहे, मी महाविकास आघाडीच्या नेत्यांना सांगितलंय, आपल्याला आता शांत बसून चालणार नाही, आपल्या सगळ्यांवर हे आरोप करतील, आपल्याला त्यांचे घोटाळे समोर आणावे लागतील, लोकशाही मार्गाने सगळं करावं लागेल, असं मुश्रीफ म्हणाले. तसेच प्रसारमाध्यमांनीही जे योग्य ते दाखवावं, कोणाच्या दबावाला बळी पडू नये असे आवाहन त्यांनी केले.