शबनम न्युज | मुंबई
मुंबई | प्रतिनिधी
लखीमपुर खीरी येथे झालेल्या अमानुष शेतकरी हिंसाचाराच्या निषेधार्थ आज महाराष्ट्रबंद पाळण्याचे आवाहन महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांनी केले आहे. शेतकऱ्यांसाठी पुकारलेला हा बंद यशस्वी झाला असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचे स्मारक असलेल्या हुतात्मा चौकात आज आम्ही लखीमपुर येथे बळी पडलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एकत्र आलो असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रात सर्व ठिकाणी बंद शांततेत सुरु असल्याची माहितीही त्यांनी दिली.
राज्य सरकारचा या बंदशी सुतराम संबंध नाही. लखीमपुर खीरी येथे मंत्र्यांच्या मुलाने ज्याप्रकारे शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घातल्या, त्या घटनेच्या निषेधार्थ हा बंद आहे. आम्ही कार्यकर्ते म्हणून या बंदमध्ये उतरलो आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.