शबनम न्युज | मुंबई
मुंबई | प्रतिनिधी
राजकारणात आता माणुसकी राहिलेली नाही हे दुदैव आहे. एक काळ असा होती की, राजकारणात माणुसकी जिवंत होती जी आता केंद्र सरकारने पूर्णपणे संपवून टाकली आहे, असा संताप खा. सुप्रियाताई सुळे यांनी व्यक्त केला. आज हुतात्मा चौक, मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे केंद्र सरकारचा निषेध नोंदवत आंदोलन करण्यात आले. यावेळी सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. मंत्र्याच्या मुलाने लोकांची हत्या केली त्याविरोधात आम्ही उभे राहिलो आहोत. ही घटना अत्यंत दुदैवी आहे. तो व्हिडीओ बघितला की अंगावर शहारे येतात आणि मस्तकात आग जाते. इतका क्रूरपणा कधी पाहिलेला आहे का? या क्रूर घटनेचा केवळ जाहीर निषेध करून संपणार नाही तर आरोपीला शिक्षा ही झालीच पाहिजे. त्याला अटक होण्यासाठी इतका वेळ लागला. खरं तर केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यायला हवा, असे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
लखीमपुर खीरी इथे झालेली शेतकरी हिंसा ही सत्तेची मस्ती आहे. घटनेचा व्हिडीओ पाहिल्यास तुम्हाला त्यात माणुसकी दिसते का? सरकार कोणाचेही असू दे, उत्तर प्रदेशमध्ये जी कृती झाली ती निंदाजनकच आहे. मी समाजकारण करते, तुम्ही पत्रकार आहात, पण आधी आपण माणूस आहोत. घडलेले कृत्य चुकीचे आणि क्रूर असल्याचे तुम्हाला वाटत नाही का? असा सवाल त्यांनी माध्यम प्रतिनिधींना केला.
केंद्र सरकारने भारताच्या नागरिकांना आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी भूमिका खा. सुप्रिया सुळे यांनी मांडली.
देशात मुघलांचे राज्य सुरू आहे, त्यांच्या संस्कृतीत महिलांचा मान-सन्मान दिसत नाही. त्यामुळे त्यांना असे वाटते की, या देशातील महिला अबला आहे. ‘उन्होंने घी देखा है, बड़गा नही देखा’… याच महाराष्ट्रातील मुली मग त्या सावित्रीबाई असो अहिल्याबाई असो किंवा राणी लक्ष्मीबाई असू दे, त्याचे कर्तृत्व केंद्र सरकार विसरले आहे. म्हणून ते महिलांवर अन्याय करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीकाही त्यांनी केंद्र सरकारवर केली. महाराष्ट्राच्या लेकी त्यांच्या अत्याचारासमोर ताकदीने उभ्या राहतील, कारण त्या जिजाऊच्या लेकी आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.